नागपूर : कोजागरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय सण संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस. मराठी दिनदर्शिकेनुसार ‘कोजागरी पौर्णिमा’ सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान असते. यंदाही दरवर्षीप्रमाणे नुकतीच कोजागिरी पोर्णिमा सर्वत्र साजरी झाली.मात्र यावेळी ती निवडणूक काळात आल्याने तिला वेगळे महत्त्व आहे.

साधारणपणे गावात, शहरातील निवासी संकुले,विविध संस्था, ज्येष्ठ नागरिक मंडळे त्यांच्या – त्यांच्या भागात सामूहिकपणे कोजागिरी साजरी करतात. हीच संधी साधून निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. समविचारी मंडळे, संस्थांच्या माध्यमातून कोजागिरी पौर्णिमा झाल्यावरही सामूहिक कोजागिरीचे कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित केले जात आहेत. यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. कारण या पक्षाकडे बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतची मंडळे आहेत. महिला मंडळे, संस्था अंशी भक्कम फळी आहे. त्यामाध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. निमित्त कोजागिरीचे आणि त्यामाध्यमातून सरकारी योजनांचा फायदा लोकांना सांगणे हा हेतू साध्य करणे हे उद्दिष्ट.

हे ही वाचा…विधानसभा निवडणुकीत ‘आरएसएस’चा किती प्रभाव पडणार? काय आहेत भाजपला सूचना

यासाठी जास्तीत जास्त लोक गोळा करणे व तेही विविध सामाजिक समुहातील लोकांना बोलावणे आलेच. मग त्यासाठी एका कार्यकर्त्याने किमान वीस लोकाना आणावें असे उद्दिष्ट ठरले. अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात एका वॉर्डात २१ ऑक्टोबरला करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होणार आहे. एका कार्यकर्त्याने किमान वीस लोकांना या कार्यक्रमाला घेऊन यावे अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे वीस लोक कसे आणावे या पेचात कार्यकर्ते सापडले,

हे ही वाचा…जहाल नक्षल दाम्पत्याचे आत्मसमर्पण; महाराष्ट्रासह ओडिशात हिंसक कारवायांत सहभाग

अशाच प्रकारे एक कार्यक्रम त्रिमूर्तीनगरात एका मंगल कार्यालयात नुकताच पार पडला. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. सार्वजनिक उद्यान, त्यानंतर निवासी संकुले या ठिकाणी असे कार्यक्रम राजकीय पक्षांच्या आयोजित केले जात आहे. कोजागिरी पौर्णिमा झाली असली तरी यानिमित्ताने होणारे दुध व अन्य वस्तू वाटप मात्र सुरू आहे. विशेष म्हणजे निवडणूक आचारसंहितेत ही बाब समाविष्ट नसल्याने राजकीय पक्षही जोरात आहे. शहराच्या विविध भागात नुकताच पेट्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम सरकारी होता,कारण योजना सरकारी होती. फक्त बांधकाम कामगारांनाच पेट्या वाटप होते.पण निवडणूक वर्षं असल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात त्यांनी सूचवलेल्यांनाही पेट्या वाटप झाले. आता कोजागिरी सुरू आहे.