लोकसत्ता टीम

भंडारा : एकीकडे देश अमृत महोत्सव साजरा करीत असताना भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. गावांचा विकास झाला नाही, पक्के रस्ते नाही. साकोली विधानसभा क्षेत्रातील अशातच काही गावांनी आता निवडणुकीच्या तोंडावर बहिष्काराचे ब्रह्मास्त्र उगारले आहे. देवरी, सायगाव, सानगाव या गट ग्रामपंचायतीनी ठराव घेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय घेतला आहे.

साकोली विधानसभा क्षेत्रातील देवरी, सायगाव व सानगाव येथे जाण्यासाठी आजही पक्का रस्ताच नाही. भावी मुख्यमंत्री यांच्याच मतदार संघाचा विकास खुंटला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राची कल्पना न केलेलीच बरी अशी प्रतिक्रिया आता विरोधकांसह गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा-सोशल मीडिया युजर्ससाठी महत्त्वाची बातमी… लाईक्स, फालोअर्स आणि सबस्क्राईबर…

नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आहे, मात्र अजूनही भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्के रस्ते नाही. मागील २५ वर्षांपासून साकोली विधानसभा क्षेत्रात राजकारण करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचा साकोली मतदार संघात विकास मात्र खुंटला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लाखनी तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेले देवरी,सानगाव, सायगाव जंगल हे व्याप्त भागात गाव असल्याने नेहमी याकडे दुर्लक्ष केले जाते, गावाला जायला पक्का रस्ता नसल्याने हे गाव पक्क्या रस्त्याच्या प्रतिक्षेतच आहेत. अनेकदा निवेदन दिले मात्र अजूनही याकडे दुर्लक्षच आहे, म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी घेतला असून तसा ठराव देखील घेण्यात आला आहे.

आणखी वाचा-काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी चेन्नीथला म्हणाले, “आता एकच लक्ष्य, महाराष्ट्र सत्ताबदल”

एकीकडे राज्यात राजकीय चिखलफेक सुरु आहे, नेते स्वतःच्या स्वार्थापोटी या पक्षातून त्या पक्षात उडया मारताना दिसतात मात्र सर्व सामान्यांच्या प्रश्नाचा यांना विसर पडला असल्याचं चित्र दिसत आहे, एक नाही तर गट ग्रामपंचायत असलेलं हे तिन्ही गाव विकाच्या मुख्य प्रवाहातून कोसो दूर आहेत. या गावांची परिस्थिती पाहिल्यावर आल्याला स्वतंत्र पूर्वीची परिस्थीती असल्याचे दिसून येते याच कच्या रस्त्यानी गर्भवती महिला, शाळकरी मुले प्रवास करीत आहेत, दुसरीकडे एसटी बस देखील गावात पोहचली नाही, पावसाळ्यात तर या रस्त्यांवर जाताना तारेवरची कसरत करावी लागत असते. -रमेश खांडेकर, उपसरपंच सायगाव.

नाना पटोले हे भावी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र भावी मुख्यमंत्री यांच्याच मतदार संघाचा विकास खुंटला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास कसा होणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. -उपेंद्र शेंडे, सरपंच देवरी