नागपूर : देशात अवयवदानाचे प्रमाण कमी असणे ही गंभीर समस्या आहे. ती सोडवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या, अवयवदानाच्या अभावामुळे गरजू रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत आहे. रुग्णांना अवयवांसाठी ताटकळत रहावे लागते. दुसरीकडे अवयवांच्या अवैध कामांना प्रोत्साहन मिळते. याला सर्वसामान्यांमध्ये अवयवदानाच्या जनजागृतीचा अभाव हे प्रमुख कारण आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी याबाबत अधिक जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राने पुढे यावे.

हेही वाचा – पवारांचे परस्पर जागावाटप, बारामतीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांना आव्हान; शिरूर, रायगड, सातारा मतदारसंघातही रिंगणात

मानसिक आरोग्याचीही समस्या गंभीर आहे. या क्षेत्रात नागपुरातील शासकीय मेडिकलमध्ये संशोधन आणि उपचार होतात. येथे मानसिक आरोग्याबाबत हेल्पलाईन आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. मेडिकलचे आरोग्य क्षेत्रात आंतराष्ट्रीय पातळीवर महत्वाचे योगदान आहे. येथील विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. आरोग्य सेवा स्वस्त सुलभ असणे हे कोणत्याही सामाजिक विकासासाठी महत्वाचे आहे. करोना काळात वैद्यकीय क्षेत्राचे महत्व समोर आले. देशातील सर्व डॉक्टर, परिचारिकांसह आरोग्य क्षेत्रातील सगळ्या व्यक्तींच्या उल्लेखनीय कामामुळेच आपण एवढ्या लोकसंख्येचे वेळेत लसीकरण करू शकलो. हल्ली देशात वैद्यकीय महाविद्यालय, एमबीबीएसच्या जागा आणि पदव्युत्तरच्या जागेत वाढ झाली. त्यामुळे डॉक्टरांची कमी दूर होईल. २०४७ पर्यंत देशाला शक्तिशाली बनविण्याचे ध्येय आहे. याची खातरजमा सरकारकडून होत आहे. मेडिकलनेही वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करायला हवे. जेणेकरून वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी इतर वैद्यकीय संस्थेसाठी मेडिकल हे रोल माॅडेल असेल.

जगभरातील रुग्ण भारतात उपचारासाठी यायला हवेत

वैद्यकशास्त्राने वैद्यकीय संशोधन आणि आरोग्य सेवेत अग्रेसर होण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. सर्वांना परवडणाऱ्या आरोग्य सेवेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून जगभरातील लोक भारतात वैद्यकीय उपचारासाठी येतील. या क्षेत्रात उल्लेखनीय काम झाल्यास भारताची वैद्यकीय संशोधनात्मक हब म्हणून ओळख होऊ शकेल, असेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांची मोठी अडचण होणार! तांत्रिक कामामुळे ‘या’ गाड्यांच्या फेऱ्या रद्द

डिजिटल नोंदीचा लाभ

केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली. त्याचा लाभ गरीब रुग्णांना होत आहे. देशातील रुग्णांच्या डिजिटल नोंदीही केल्या जात आहेत. त्यामुळे या रुग्णांची माहिती कोणत्याही डॉक्टरला सहज मिळून रुग्णांवर अचूक उपचार होईल. केंद्र सरकार जिल्हा रुग्णालयांसोबत वैद्यकीय महाविद्यालयांनाही चांगला निधी देत आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील काही प्रादेशिक असमतोल दूर होऊ शकेल, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

शेकडो माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती

नागपुरात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या व आता अमेरिका, इंग्लंड, त्रिनिदाद ॲन्ड टोबॅगोसह इतर देशांमध्ये कार्यरत दीडशेहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यापैकी काहींनी महाविद्यालयासाठी आर्थिक देणगीही दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of organ donation is a serious problem asserts president draupadi murmu amrut mahotsav of medical in nagpur begins mnb 82 ssb
Show comments