Navratri 2024 : देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा दुर्गोत्सव यवतमाळात उत्साहात सुरू आहे. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी दररोज लाखो भाविक यवतमाळात दाखल होत आहेत. नवरात्रीच्या पर्वावर होणारा हा दुर्गोत्सव यवतमाळकरांसाठी लोकोत्सव ठरला असून शेकडो हात या उत्सवाला यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.

शहरातील विविध मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे, दुर्गादेवीची प्रसन्न भाव असलेली मूर्ती, भाविकांसाठी पूर्णवेळ महाप्रसाद आणि त्या जोडीला सामाजिक उपक्रम असे एकूण दुर्गोत्सवाचे स्वरूप आहे. कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने आणि भक्तांच्या उत्साहाने या दुर्गोत्सवाला नवचैतन्य प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील विविध भागांसह परजिल्ह्यातून आणि तेलंगणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यातून भाविक यवतमाळात दाखल होत आहेत. दररोज सायंकाळी ५ वाजल्यानंतर पहाटे तीन, चार वाजेपर्यंत गर्दीचा महापूर शहरात ओसंडून वाहत आहे. नवरात्रीच्या चवथ्या दिवसापासून अष्टमीपर्यंत जवळपास २० ते २५ लाख नागरिक हा दुर्गोत्सव बघण्यासाठी यवतमाळात येतात. या उत्सवामुळे स्थानिक रोजगारही वाढला आहे. अनेक मंडळ भाविकांसाठी महाप्रसाद ठेवतात. अनेक छोट्या व्यावसायिकांनी जागोजागी उपवासाचा नाष्टा आदी दुकाने लावली आहेत.

हेही वाचा – Video : माझं जंगल, माझं राज्य… ‘या’ वाघाने थेट रस्त्यालगतच मांडले ठाण; मग दाढी कुरवळत…

येथील बालाजी चौकातील बालाजी दुर्गोत्सव मंडळाच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष सुभाष राय हे गेल्या ३५ वर्षांपासून लंगर उपक्रम राबवित आहेत. छोटी गुजरीमधील एकता दुर्गोत्सव मंडळ, वडगाव रोडवरील सुभाष क्रीडा मंडळाने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी उपवासाच्या फराळाची व्यवस्था केली आहे. अनेक दुर्गोत्सव मंडळ भक्तांचे प्रबोधानही करत आहेत. बेटी बचाव, स्वदेशीचा वापर करा, बचत करा, यासारखे संदेश देण्यात येत आहे.

गणपती मंदिर चौकातील नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाची अन्नदानाची अखंड परंपरा आहे. मंडळाचे हे ५३ वे वर्ष आहे. या ठिकाणी भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मंडळ अखंड दीपज्योत ही संकल्पना राबविते. हे दीप नऊ दिवस तेवत असतात. यावर्षी १००१ अखंड दीप या विकाणी तेवत आहेत. यासाठी मंडळाचे असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

हेही वाचा – गडकरींचे खाद्य प्रेम अन् पाटोडी विक्रेत्यांची सोय

आठवडी बाजारात यवतमाळची ग्रामदेवी आहे. या ठिकाणी हिंदुस्थानी दुर्गादेवी मंदिरात गेल्या सहा वर्षांपासून शितलामाता मंदिरात जलार्पण केले जाते. यासाठी पहाटेपासून भक्त रांगेत असतात. गांधी चौकातील गांधी चौक दुर्गोत्सव मंडळ भक्तांचा निरंकार उपवास लक्षात घेता दूध वितरण करीत आहे. दररोज ६०० ते एक हजार लिटर दुधाचे वितरण केले जात आहे.