नागपूर : महाराष्ट्रात अन् त्यातही कापूस पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना सरकारकडून सानुग्रह राशी दिली जाते. मात्र आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या मागे त्याच्या पत्नीचा कुठेच विचार केला जात नाही. कापूस पट्ट्यात अशा २५ हजारांच्या आसपास महिला आहेत. त्यांच्यासाठी ‘अ‍ॅग्रो थिएटर’च्या माध्यमातून चळवळ राबवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याच चळवळीचा एक भाग म्हणून मधल्या काळात ‘तेरवं’ हा दीर्घांक रंगमंचावर सादर केला. महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग झाले. मुंबई विद्यापीठाच्या वसंतोत्सवातही सादरीकरण झाले. त्यानंतर नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाकडून आंतराष्ट्रीय ड्रामा फेस्टीव्हलमध्ये या प्रयोगाची निवड करण्यात आली. गुजरात येथील एकता नगर येथे या नाटकाचे सादरीकरण या अंतर्गत झाले. या नाटकाच्या लेखनासाठी, दिग्दर्शनासाठी मानाचा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार श्याम पेठकर (लेखक) यांना मिळाला. हरीष इथापे (दिग्दर्शक) यांनाही अनेक पुरस्कार, सन्मान या नाटकासाठी मिळाले. या नाटकासाठी आम्ही एक प्रयोग केला होता. या नाटकात १३ पात्रं होती आणि त्यासाठी आम्ही शेतकरी आत्महत्याग्रस्त एकल महिलांसह शेतकर्‍यांच्या मुली, सुना यांना नाट्य प्रशिक्षण दिले आणि त्यांनीच या नाटकात भूमिका केल्या. अगदी स्टेज लावण्यापासून सारी कामे या एकल महिलांनी केली. त्यातील वैशाली येडे यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान देण्यात आला.

हेही वाचा – ऑनलाईन हेडफोनची ऑर्डर केली, पण मिळाला दगड; नेमकी काय आहे भानगड? वाचा सविस्तर…

हेही वाचा – “आरपीआयला राज्यात मंत्रिपद दिल्यास भाजपलाच लोकसभेत फायदा,” रामदास आठवलेंचे भाकीत; म्हणाले…

नाटकाच्या निमित्ताने या महिलांचा न हारता जगण्याचा संघर्ष व त्यांच्या समस्या सरकार, व्यवस्था आणि समजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकाकी पडलेल्या महिलांचा संघर्ष देशाला कळावा यासाठी आता समाजमाध्यमांवर ‘हॅशटॅग तेरवं’ ही ई-चावडी सुरू करण्यात येणार आहे. त्याचे लाँचिंग १७ ऑक्टोबर रोजी या महिलांच्या हातूनच दुपारी ४ ते ६ या वेळात करण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ नाटककार, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, मराठी चित्रपटांचे नायक, ‘नाम’ फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आत्महत्याग्रस्त एकल महिलांची माहिती देण्यासाठी तसेच या संदर्भात चर्चा-संवाद व्हावा म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू करत आहोत, असे या ॲग्रो थिएटरचे श्याम पेठकर व हरीश इथापे यांनी कळविले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Launching of hashtag terva movement for farmer widows on 17th cwb 76 ssb
Show comments