नागपूर : दिघोरी टोल नाक्याजवळ झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात दोघांचे बळी गेले तर ७ जण गंभीर जखमी झाले होते. एवढ्या गंभीर प्रकरणात हलगर्जीपणा करणे वोठाडा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला चांगले भोवले. आरोपींना मदत होईल, अशी कृती केल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांना तडकाफडकी निलंबित केले. तसेच जरीपटक्याचे ठाणेदार दीपक भीताडे यांना तक्रारदारांशी संवाद न साधता गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बदली करण्यात आली.

सोमवारी मध्यरात्री दिघोरी नाका चौकात मद्यधुंद विद्यार्थ्याने भरधाव कार पदपथावर चढवून ११ जणांना चिरडले होते. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी कार मागे-पुढे घेऊन जखमींचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या अपघातात कांतीबाई गजुड बागडिया (४२, करवली, बुंदी- राजस्थान) आणि सीताराम बाबुलाल बागडिया (३०) हे दोघे ठार झाले होते. तर कविता बागडिया (२८), बुलको बागडीया (८), हसीना बागडीया (३), सकीना बागडीया (दिड वर्ष), हनुमान बागडीया (३५), विक्रम उर्फ भूषा (१०) आणि पानबाई (१५) हे गंभीर जखमी झाले होते. हसीना नावाच्या चिमुकलीवर अद्यापही मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हेही वाचा – ‘कवच’विनाच धावताहेत महाराष्ट्रात रेल्वे गाड्या; कांचनगंगा अपघातानंतर…

एवढा मोठा अपघात झाल्यानंतर ठाणेदार विजय दिघे हे वेळेवर घटनास्थळावर उपस्थित झाले नव्हते. तसेच आरोपी वंश झाडे (१९) रा. योगेश्वरनगर, सन्मय पात्रिकर (२०) रा. अंबानगर, अथर्व बानाईत (२०) रा. अयोध्यानगर, हुडकेश्वर, ऋषिकेश चौबे (२०) रा. रामेश्वरी अजनी, अथर्व मोगरे (२०), रा. महाल आणि चालक भूषण लांजेवार (२०) रा. दिघोरी यांनी अटक करण्याऐवजी एका राजकीय नेत्याच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात हजर करवून घेतले होते. आरोपींच्या रक्ताचे नमून न्यायवैद्यक प्रयोगशा‌ळेत पाठविण्यासाठी विनाकारण उशीर केला. तसेच तपासातसुद्धा हलगर्जीपणा केला. त्यामुळे ठाणेदार विजय दिघे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी सीमा दाताळकर यांनी वाठोड्याच्या ठाणेदार पदाचा कार्यभार स्वीकारला. या अपघाताचा तपास आता पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. तसेच जरीपटक्याचे ठाणेदार दीपक भीताडे यांच्यावरही हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांची बदली विशेष शाखेत करण्यात आली. त्यामुळे अन्य ठाणेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – VIDEO : काँग्रेस खासदार धानोरकर यांच्या भावाकडून कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, कार्यकर्त्यांकडून मारहाण

आणखी काही ठाणेदारांची होणार बदली

शहरातील काही ठाणेदारांचे परीसरातील अवैध धंद्यांवर नियंत्रण नाही. तसेच गुन्हेगारांशी हितसंबंध आहेत. काही नवीन ठाणेदारांना अनुभव नसल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण नाही. या सर्व बाबी लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणखी काही ठाणेदारांच्या बदल्या करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.