वर्धा : बोर अभयारण्य हे बिबट, वाघ तसेच अन्य वन्य प्राण्यांच्या समृद्ध हजेरीने ओळखले जाते. लगतच्या अनेक गावांमध्ये मानव व प्राण्यांच्या संघर्षाच्या घटना सातत्याने या भागात घडत असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यातूनच हे प्राणी आता रस्त्यावर यायला लागले आहेत. त्यातच एका बिबट्याचा मृत्यू झाला.

वर्धा नागपूर रस्त्यावर केळझरच्या अलीकडे आज पहाटे एका अज्ञात वाहनाची धडक बसून बीबट ठार झाला आहे. मादी बिबट असून दोन ते अडीच वर्षाची असल्याची सांगण्यात आले. केळझर येथे वन विभागाची नर्सरी आहे. त्याच ठिकाणी शव विच्छेदन व अन्य प्रक्रिया होणार असल्याचे वन अधिकारी अमरसिंग पवार यांनी सांगितले. बिबट शहर सीमेत येण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र सध्याचा काळ हा प्रजननाचा काळ आहे. त्यामुळे मादी बिबट भक्ष्य शोधण्यासाठी जवळपासचे ठिकाण शोधत असतात. गाव, महामार्ग, शहरी वसाहत अशा परिसरात वावर वाढत असल्याचे निरीक्षण प्रसिद्ध पशुसेवक व करुणाश्रमचे आशीष गोस्वामी यांनी सांगितले. नागपूर बायपासवर दोन महिन्यांपूर्वी बिबट दिसल्याचे नागरिकांनी सांगितले होते. अद्याप या रस्त्यालगत कारला गावाजवळ बिबट्याची चाहूल जाणवत असल्याचे गोस्वामी यांनी नमूद करीत यावर काहीच उपाय नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – बाळापूरमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावर भाजपचे बळीराम सिरस्कार; रिसोडमध्ये भावना गवळींना संधी

हेही वाचा – “दादाराव केचे आर्वीतून उमेदवारी अर्ज भरणार, पण…”, सुधीर दिवे म्हणाले…

गत काही वर्षांत अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत. सावंगी येथील मेघे विद्यापीठात बिबट्याने ठाण मांडले होते. नंतर याच मार्गांवरील हिंदी विद्यापीठात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. मोठ्या प्रयत्नांनतर त्यास पकडण्यात यश आले होते. त्यानंतर बायपासवरील हाय व्हयू हॉटेल परिसरात बिबट दिसून आला. मात्र खरी भीती बोर बफ्फर झोनमध्ये येणाऱ्या काही गावात दिसून येते. येथील गावकऱ्यांनी हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा केली आहे. तसेच काही गावे पुनर्वसन होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तसा प्रस्ताव आमदार डॉ. पंकज भोयर यांनी वन खात्यास दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यास मान्यता पण दिली. पण पुढे काहीच झाले नसल्याची भावना भीतीत वावरणारे गावकरी व्यक्त करतात. कारण गोठ्यात बांधलेली जनावरे किंवा शेतात चारायला गेलेली पाळीव जनावरे यांचा वाघ, बिबट यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे.