अकोला : जिल्ह्यात पशुधनावर चारा टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चाऱ्याची व्यवस्था करण्यात पशुपालकांची दमछाक होत असून ते चिंतेत सापडले आहेत. दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातून चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. गतवर्षीच्या हंगामामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्याचा परिणाम पिकांवर झाला. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे खरीप हंगामातील ज्वारी पिकाची पेरणी अत्यल्प प्रमाणात होते. शेतकरी व पशुपालकांना चाऱ्यासाठी सोयाबीन, तूर व हरभरा पिकांचे कुटारावरच अवलंबून राहावे लागत आहे. तूर व हरभरा कापणी सुरू झाली असून, मळणी सुद्धा सुरू आहे. तुरीच्या कुटार सध्या चार-पाच हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉलीप्रमाणे विक्री होत आहेत. हरभरा कुटाराचे दर सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे जनावरांसाठी चारा मिळणे कठीण झाले. अनेक शेतकऱ्यांनी बाहेर गावी धाव घेत चारा खरेदी सुरू केल्याचे चित्र आहे. हेही वाचा >>>राज्यातील वीज पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका!; कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र दुष्काळसदृश परिस्थितीत उन्हाळ्याच्या तोंडावरच जिल्ह्यात चारा टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातील पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहण्यासाठी चाऱ्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. त्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले. आगामी दोन महिन्यांच्या कालावधीसाठी हा आदेश देण्यात आला आहे. चाराटंचाईची स्थिती लक्षात घेता पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्यात पशुपालकांची चांगलीच धावपळ होत आहे. अनेक पशुपालकांना हजारो रुपये खर्च करून चारा खरेदी करावा लागतो. वाढता खर्च व चाऱ्याची टंचाईमुळे पशुधन सांभाळणे शेतकऱ्यांसाठी अवघड होऊन बसले आहे. जिल्ह्यात एक लाख ५५ हजार मेट्रीक टन चारा गत वर्षीच्या पेरणी अहवालानुसार अकोला जिल्ह्यात एक लाख ५५ हजार मेट्रीक टन चारा उपलब्ध आहे. चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी आणण्यात आली. त्याचा अभिप्राय पशुसंवर्धन उपायुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.