नागपूर: गुहागारच्या किनाऱ्यावर उपग्रह टॅग केलेल्या ‘बागेश्री’ या ऑलिव्ह रिडले कासवाने अवघ्या चार महिन्यात श्रीलंकेची किनारपट्टी गाठली आहे. गुहागर ते कन्याकुमारीअसा प्रवास करुन ती श्रीलंकेच्या पाण्यात उतरली आहे.
भारतीय वन्यजीव संस्थेची चमू, मँग्रोव्ह फाउंडेशनचे सदस्य व महाराष्ट्र वनविभागाच्या रत्नागिरी विभागाच्या पथकाने २१ फेब्रुवारीला गुहागर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घातली. या समुद्रकिनाऱ्यावर घरटी बांधण्यासाठी आलेल्या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी बांधून झाल्यानंतर २२ फेब्रुवारीला त्यांना सॅटेलाईट टॅग बसवण्यात आले. ‘बागेश्री’ व ‘गुहा’ अशी नावे देण्यात आलेल्या दोन्ही मादी कासवांना २३ फेब्रुवारीला समुद्रात परत सोडण्यात आले. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची तुरळक घरटी आहेत.
हेही वाचा… नागपूर: सुपरस्पेशालिटी रुग्णालयात चक्क कोब्रा…
आत्तापर्यंत, ऑलिव्ह रिडले फक्त पूर्व किनारपट्टीवर टॅग केले गेले आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडलेजचा हा पहिला उपग्रह टॅगिंग प्रकल्प आहे. या अभ्यासामुळे पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची हालचाल समजण्यास मदत होईल.
सोबतच टॅग करण्यात आलेले ‘गुहा’ हे मादी ऑलिव्ह रिडले कासव लक्षद्वीपपर्यंत जाऊन परत आले आणि आता ते कर्नाटक किनाऱ्याच्या आसपास आहे. मागच्या वर्षी पाच कासवांना उपग्रह टॅग करण्यात आले होते पण ॲागस्ट महिन्यापर्यंत काही तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे सिग्नल बंद झाले. आता यावर्षी दोन कासवांना लावलेले उपग्रह टॅग जास्तीत जास्त माहिती पोहोचवू शकतील, अशी संशोधकांना अपेक्षा आहे.