राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक; जमिनीची धूप होत असल्याचा परिणाम
चंद्रशेखर बोबडे
नागपूर : विकास प्रकल्पांसाठी एकीकडे मोठय़ा प्रमाणात शेतजमीन अधिग्रहीत केली जात असतानाच दुसरीकडे जमिनीची धूप होत असल्याने दरवर्षी लागवडीखालील शेतजमिनीची हेक्टरी १० टनाहून अधिक हानी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत देशभरातील वेगवेगळय़ा एजन्सी व संस्था त्यांनी निर्धारित केलेल्या निकषानुसार निष्कर्ष काढतात.
केंद्रीय कृषी खात्याच्या अखत्यारितील भारतीय कृषी संशोधन परिषदेने याबाबतत डेटा संकलित करून वरील निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार वर्ष २०१८-२०१९ मध्ये जमिनीची धूप होण्याचे प्रमाण दरवर्षी दरहेक्टरी १० टनाहून अधिक असून यामुळे देशभरातील ४२.६१ दशलक्ष हेक्टर लागवडयोग्य क्षेत्र प्रभावित झाले. त्यात महाराष्ट्रातील ७६३१ हेक्टरचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक प्रभावित क्षेत्रात वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानचा (१० हजार २३८ हेक्टर) क्रमांक सर्वात वर आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, हे येथे उल्लेखनीय. इतरही राज्यांना कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे.
का होते जमिनीची धूप? साधारणपणे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून जाते, अतिउष्णतामानामुळे जमिनीला भेगा पडतात. या व तत्सम कारणांमुळे जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे उत्पादन क्षमताही कमी होते. ती वाढवण्यासाठी नंतर रासायनिक खतांचा वापरही वाढवला जातो.
देशातील प्रभावित लागवड क्षेत्र
(वर्ष २०१८-२०१९)
राज्य हेक्टर
राजस्थान १०,२६८
महाराष्ट्र ७६३१.२५
गुजरात ४३३३.९८
कर्नाटक ४७४०.११
ओडिशा ४४३९
झारखंड ३९१३.११
तेलंगणा २८१२.२०
जमिनीची धूप झाल्याने तिचा कस कमी होतो. ती पूर्ववत होण्यासाठी शेकडो वर्षांचा काळ लागतो. अतिपावसामुळे जमीन खरडून जाणे, अति तापमानामुळे जमिनीला भेगा पडणे व तत्सम कारणांमुळे असे होते. ते थांबवायचे असेल तर मृदसंधारणाचे शास्त्रीय उपाय जिल्हास्तरावर राबवणे गरजेचे आहे.-डॉ. शरद निंबाळकर, निवृत्त कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
देशात दरवर्षी शेतजमिनीच्या मातीची हेक्टरी १० टन हानी
विकास प्रकल्पांसाठी एकीकडे मोठय़ा प्रमाणात शेतजमीन अधिग्रहीत केली जात असतानाच दुसरीकडे जमिनीची धूप होत असल्याने दरवर्षी लागवडीखालील शेतजमिनीची हेक्टरी १० टनाहून अधिक हानी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
Written by चंद्रशेखर बोबडे

First published on: 04-05-2022 at 01:56 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loss hectare agricultural land country every year rajasthan maharashtra consequences soil erosion amy