लोकसत्ता टीम

अकोला : पश्चिम विदर्भात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या धर्मपिठाचे महंत सुनिल महाराज यांनी नाराज होऊन शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १० महिन्यांपासून भेटीची वेळही देऊ शकत नसतील, तर पक्षात राहून उपयोग काय? अशी नाराजी व्यक्त करीत महंत सुनिल महाराज यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दिग्रस मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी ते इच्छूक होते.

बंजारा समाजाची काशी अशी ओळख असलेल्या पोहरादेवी येथील श्री जगदंबा देवी, संत बाबनलाल महाराज महाशक्तीपीठ संस्थान ट्रस्टचे सचिव महंत सुनिल महाराज यांनी शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर २०२२ मध्ये पक्षप्रवेश केला होता. उद्धव ठाकरेंकडून भेटीसाठी वेळ मिळत नसल्याने ते नाराज होते.त्यामुळे त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. महंत सुनिल महाराज यांनी आज, २३ ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्र सादर करून तीव्र नाराजी व्यक्त केली.

आणखी वाचा-निवडणुकीच्या तोंडावर संघप्रणीत संघटना सरकारवर संतापली, भाजपला टेंशन…

९ जुलै २०२३ रोजी पोहरादेवी येथे व फेब्रुवारी २०२४ मध्ये जनसंवाद यात्रेनिमित्त वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना भेट झाली होती. त्यानंतर १० मिनिटांच्या भेटीची वेळ मागण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, आपल्या व्यस्त कार्यामुळे भेटीची वेळ मिळू शकली नाही. काही नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशाची यादी पक्षाकडे सादर केली होती. त्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाला देखील निमंत्रित केले नाही, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

पक्षाने उमेदवारी द्यावी, हा उद्देश नव्हता. पक्षासाठी कार्य करायचे होते. संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज यांचे वंशज व बंजारा समाजाचे धर्मपिठाच्या महंतला आठ ते दहा महिन्यापासून भेटीची वेळ मिळत नसेल, तर पक्षाला माझी काहीच गरज नसल्याचे स्पष्ट होते, अशी तीव्र रोषाची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त करीत राजीनामा सादर केला. बंजारा समाजाची मोठी मतपेढी लक्षात घेता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

आणखी वाचा-‘नो राईट टर्न’: वाहतुकीच्या नव्या प्रयोगावर नागपुरकरांची प्रतिक्रिया, हा तर ‘नाकापेक्षा मोती जड’!

शिवसेनेच्या पडत्या काळात उद्धव ठाकरे यांना साथ दिली. मात्र, त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न केल्यावरही भेटीसाठी १० मिनिटे सुद्धा दिले नाहीत. पक्षाला माझी गरज नाही, हे लक्षात घेऊन राजीनामा दिला आहे. -महंत सुनिल महाराज, पोहरादेवी.