नागपूरः सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितने (महापारेषण) मागील दोन वर्षांची विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप आहे. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण २ हजार ५४१ पदांच्या भरतीसाठी भरती २०२३ जाहीर झाली होती. त्यानुसार मोठ्या संख्येने इच्छुक पात्र उमेदवारांनी १० डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज केले.

परंतु, या परीक्षेसह त्यानंतरच्या सर्व म्हणजे वर्ष २०२३ आणि २०२४ मधील महापारेषणच्या सर्व पदभरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहे. महापारेषण कंपनीकडून त्याबाबत त्यांच्या संकेतस्थळावरही १४ जूनला याबाबत सूचना प्रसारित केली गेली.

हेही वाचा – अकोला : कार्यकर्त्याने चक्क नाना पटोले यांचे पाय धुतले, नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे

सूचनेमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी, आरक्षणाच्या स्थितीची पुनर्गणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे या जाहिरातींवरील पदांसाठीची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले. दरम्यान आरक्षण स्थितीची पुनर्गणना केल्यानंतर, कंपनीकडून नवीन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही कंपनीचे स्पष्ट केले. या विषयावर महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

या पदांची भरती रद्द

………………………………………………………….

जाहिरातीची दिनांक, पदाचे नाव
…………………………………………………………..

०४-१०-२०२३ कार्यकारी अभियंता

०४-१०-२०२३ अतिरिक्त कार्यकारी अभियंता

०४-१०-२०२३ उपकार्यकारी अभियंता

०४-१०-२०२३ सहाय्यक अभियंता (दूरसंचार)

०४-१०-२०२३ सहाय्यक अभियंता

२०-११-२०२३ वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)

२०-११-२०२३ तंत्रज्ञ- १

२०-११-२०२३ तंत्रज्ञ- २

२०-११-२०२३ विद्युत सहाय्यक (पारेषण, कंत्राटी)

१९-०१-२०२४ सहाय्यक अभियंता

३१-०१-२०२४ वरिष्ठ तंत्रज्ञ

३१-०१-२०२४ तंत्रज्ञ- १

३१-०१-२०२४ तंत्रज्ञ- २

ऊर्जामंत्री फडणवीस यांना निवेदन

संतप्त उमेदवारांकडून राज्याचे ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत ही परीक्षा रद्द न करता पूर्ववत करण्याची मागणी केली गेली. तसेच बीई., बी.टेक साठी असलेल्या या पदाच्या भरतीची अंतिम निवड यादी ही कुठल्याच प्रकारचे अतिरिक्त गुण न देता आयबीपीएस परीक्षेच्या गुणानुसारच घेण्याची मागणीही काही उमेदवारांकडून केली गेली.

हेही वाचा – यवतमाळ : बकरी ईद साजरी होत असताना वीज कोसळून २१ बकऱ्या ठार, शेतकऱ्याचा मृत्यू

महापारेषण कंपनीबाबत…

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. (संक्षिप्त नावः ‘महापारेषण’) ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. पूर्वीच्या ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ या संस्थेची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर जून २००५ मध्ये ‘महापारेषण’ कंपनी अस्तित्वात आली. विजेच्या निर्मिती स्थानापासून ते वितरण केंद्रापर्यंत वीज पोहोचविण्याची म्हणजेच विजेचे पारेषण करण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीवर आहे. यासाठी महापारेषण कंपनीची विधीवत रचना करण्यात आली. विजेचे पारेषण हे सुरक्षितपणे, तसेच विजेची कमीत-कमी हानी होईल आणि तिचा भार समतोल राहील, अशा पद्धतीने करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे कार्य ‘महापारेषण’ कंपनी करीत आहे.