नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दिसऱ्या आठवड्यात घेतली जाते. तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते. तर परीक्षांचा ऑनलाईन निकाल मे अखेरीस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो. यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बोर्डाने आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये मोठा बदल केला आहे.

सीबीएसईच्या धर्तीवर हा बदल करण्यात आला असून त्यामुळे कॉपी करून उत्तीर्ण होणाऱ्यांवर चाप बसणार आहे. यंदापासून काय बदल राहणार ते सवीस्तर समजून घेऊया.

हेही वाचा >>> भांडण की दंगामस्ती! ताडोबातील ‘छोटी तारा’ पाठोपाठ आता तिचे बछडेही…

परीक्षा केंद्रांना आहेत या सूचना

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वारंवार देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.

त्यामुळे कॉपी करणारे विद्यार्थी, त्यांना मदत करणारे नातेवाईक आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीचा जालीम उपाय करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Election 2024: काँग्रेसमध्ये उमरखेडसाठी सर्वाधिक इच्छुक, दिग्रसमध्ये केवळ दोन!

तर परीक्षा केंद्रच रद्द

राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आता सीबीएसई बोर्डाच्या धरतीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसतील, त्यांचे परीक्षा केंद्रच रद्द होणार आहे. परीक्षा केंद्र कायम ठेवायचे असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती आहे.  दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. तर शाळांसाठीही आता बोर्डाने अनेक सूचना जाहीर केल्या आहेत.

ग्रामीण परीक्षा केंद्रातील गैरप्रकार

– राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये विद्यार्थ्यांना कॉपी करून उत्तीर्ण करून देणारी परीक्षा केंद्र उदायास आली आहेत. 

– ग्रामीण भागात अशा परीक्षा केंद्रांची संख्या मोठी असते.

– या अडवळणाच्या केंद्रावर राज्यातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खास येतात.

– साधी रिक्षा सुद्धा न येणाऱ्या या गावांमध्ये परीक्षेच्या काळात लाखोच्या कार उभ्या असतात.

– या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली असते. – आता अशा परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.