नागपूर : गेल्या वर्षभरापासून देशात ‘हायटेक’ असलेल्या सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून दर दिवशी १८० पेक्षा जास्त सायबर गुन्हे नोंदविल्या जात आहेत. सध्या सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात ६५ हजार ८९३ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन लैंगिक शोषण केल्याचे आहेत. देशात तेलंगणा राज्य पहिल्या क्रमांकावर असून १५ हजार २९७ गुन्हे दाखल आहेत तर यामध्ये महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे, ही धक्कादायक आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीतून प्राप्त झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरात सायबर गुन्ह्यांचा विळखा घट्ट होत असताना दुर्दैवाने महाराष्ट्र त्यात आघाडीच्या चार क्रमांकामध्ये आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रकार वाढत असताना त्यातील आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. देशातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यासंदर्भात योग्य ते प्रशिक्षण मिळत नसल्यामुळे सायबर गुन्हेगारांना अटक करणे शक्य होत नाही. पूर्वी विदेशातील सायबर गुन्हेगारांचे आव्हान पोलिसांना होते. मात्र, आता चक्क अनेक राज्यात सायबर गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्या निर्माण होत आहेत.

हेही वाचा : “रोहीत पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख स्वच्छ चेहरा राहील”, कोण म्हणतंय जाणून घ्या…

छत्तीसगढ, बिहार, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये सायबर टोळ्या सक्रिय आहेत. तेथून ते देशभरात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे करतात. देशात २०२२ मध्ये सायबरचे ६५ हजार ८९३ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सर्वाधिक गुन्हे ऑनलाईन फसवणुकीचे असून त्यापाठोपाठ ऑनलाईन लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये २४.४ टक्क्यांनी वाढ झाली असून सर्वाधिक सायबर गुन्हे तेलंगणात (१५,२९७) दाखल झाले आहेत. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक (१२,५५६) तर तिसऱ्या स्थानावर उत्तरप्रदेश (१०,११७) गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्राचा चवथा क्रमांक असून राज्यात ८ हजार २४९ सायबर गुन्हे दाखल आहेत.

हे आहेत सर्वाधिक सायबर गुन्हे

देशभरात दाखल झालेल्या ६५ हजार सायबर गुन्ह्यांपैकी ४२ हजार ७०० गुन्हे विविध प्रकारे केलेल्या आनलाईन फसवणुकीचे आहेत. सायबर गुन्हेगारांनी ३ हजार ४६८ जणांना ऑनलाईन खंडणी देण्यास भाग पाडले आहे. तसेच अश्लील छायाचित्र-चित्रफित सार्वजनिक करण्याची भीती घालून ३ हजार ४३४ जणांकडून खंडणी घेतली आहे. अनेक उच्चशिक्षित लोकांची आर्थिक फसवणूक झाली असून पार्टटाईम जॉबचे आमिष, लिंकवर क्लिक करुन बँक खाते रिकामे करणे किंवा बँकेची ओटीपी विचारुन फसवणूक केल्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : इथेनॉल बंदीमुळे साखरउद्योग संकटात; कारखान्यांना राज्य बँकेचा कर्जपुरवठा बंद,आधारभूत किमतीत वाढीची मागणी

पोलिसांसमोरील आव्हाने

सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या झारखंड, छत्तीसगढ, उत्तरप्रदेश अशा राज्यातील सीमावर्ती भागातून काम करतात. गुन्हेगार शेकडो मोबाईल, सीमकार्ड आणि अनेक गोरगरीबांच्या बँक खात्याचा पैशाच्या देवाण-घेवाणीसाठी वापर करतात. त्यामुळे पोलिसांच्या हाती सायबर गुन्हेगार लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच सायबर गुन्ह्यांचे ज्ञान असणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या ५ ते ७ टक्के आहे. पोलिसांना वेळोवेळी सायबर तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही देण्यात येत नाही. त्यामुळे भविष्यात सायबर गुन्हेगारी पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.

हेही वाचा : सहकार कायद्यातील सुधारणा मागे; राष्ट्रवादीच्या विरोधामुळे सरकारचा निर्णय 

राज्य – सायबर गुन्हे

तेलंगणा – १५,२९७
कर्नाटक – १२,५५६
उत्तरप्रदेश – १०,११७
महाराष्ट्र – ८,२४९
आंध्रप्रदेश – २३४१

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ranks fourth in cyber crime in the country adk 83 css