बुलढाणा : महाराष्ट्र राज्यावर बावन्न हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र, राज्याची आर्थिक स्थिती अन् क्षमता उत्तम आहे. यामुळे ‘लाडकी बहिण’ सह अन्य जन कल्याणकारी योजनांची सुरळीत आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा भाजपाच्या राज्य कोअर समितीचे सदस्य, माजी मंत्री संजय कुटे यांनी आज येथे केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्रितच लढणार असून उध्या पासून युतीचे संयुक्त मेळाव्यास प्रारंभ होत असल्याची महत्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली आहे.

आमदार संजय कुटे यांनी शुक्रवारी (ता. ५) रोजी संध्याकाळी स्थानिय पत्रकार भवनात प्रसिद्धी माध्यमा सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आग्रही प्रतिपादन केले. राज्याच्या भाजप वर्तुळातील महत्वपूर्ण नेते म्हणून ओळख असणारे आमदार कुटे यांनी यावेळी राज्य शासनाचा अर्थसंकल्प, त्यातील मुख्य योजना यावर प्रकाश टाकला. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी कालपरवा मांडलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक, सर्व समाजघटकांना न्याय देणारा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

हेही वाचा…वर्धा : ऑनर किलिंग! मुलीची हत्या करणाऱ्या बापास आजीवन कारावास, पत्नीने दिली पती विरोधात साक्ष

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन ( स्टायफंड), मुलींना मोफत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण या अर्थ संकल्पातील तरतुदी कौतुकास्पद आहे. यंदाचा अर्थसंकल्प महिला केंद्रित असून लोकसंख्येत ५० टक्के असलेल्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा याचा उद्धेश आहे. संकल्पात सर्व समाजघटकांना न्याय देण्यात आल्याचे आमदार कुटे यावेळी म्हणाले.

सोयाबीन कपाशी उत्पादकांना जुलैमधेच अनुदान

सोयाबीन-कपाशी उत्पादकांना ५ हजार रुपयांचे अनुदान( भावांतर) देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. चालू जुलै महिन्यातच २ हेक्टर मर्यादेत हे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीन-कपाशीला मिळालेला कमी भाव, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान यामुळे लाखो शेतकरी अडचणीत आले होते. त्यांना दिलासा आणि मदत म्हणून हे अनुदान देण्यात येणार आहे. लाडकी बहिण योजनेच्या पात्रता शिथिल करण्यात आल्या असून यामुळे महिलांच्या अडचणी दूर झाल्या आहे. यासाठी एकूण ४६ हजार कोटींचे एकूण प्रावधान असून यंदा त्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पत्रपरिषदेला विजया राठी, डॉ राजेश्वर उबरहंडे, किरण राठोड, रंजना पवार, प्रा. प्रभाकर वारे, नितीन दासर हजर होते.

हेही वाचा…ओहरहेड वीज वाहिन्यात बिघाड, नागपुरात मेट्रोची सेवा विस्कळित

आर्थिक सुदृढता म्हणून अंमलबजावणी शक्य

कोट्यवधी रुपयांच्या या योजनांची अंमलबजावणी कशी करणार आणि राज्याची आर्थिक स्थिती, कर्ज या संदर्भात यावेळी कुटे यांना विचारणा करण्यात आली.यावर ते म्हणाले की राज्याची आर्थिक स्थिती सुदृढ उत्तम आहे. यामुळे राज्यावर ५२ कोटींचे कर्ज असले तरी राज्याचे उत्त्पन्न, वाढते आर्थिक स्रोत,आणि केंद्र सरकारकडून मिळणारा भरघोस निधी मदत यामुळे राज्याचे ‘बजेट’ आणि आर्थिक आवाका मोठा आहे. त्यामुळे अमलबजावणीत कुठलीच अडचण येणार नाही असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा…आशियाई क्रीडा स्पर्धेत योगाचा समावेश होणार, केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

महायुती अभेद्य

लोकसभेचे निकाल अनपेक्षित लागले नसले तरी विधानसभेत आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत, असे त्यांनी एका प्रश्नच्या उत्तरात सांगितले. याची सुरुवात उद्या शनिवार पासूनच होत असून शनिवारी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा राज्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर क्रमाक्रमाने जिल्हा स्तरीय, तालुका व मतदान केंद्र स्तरावर युतीचे मेळावे घेण्यात येणार आहे.