नागपूर : राज्यात यंदाच्या मान्सूनने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा दिला आहे. मान्सूनच्या वेळेतील आगमनापासून तर आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा मान्सून “मान्सून” सारखा कोसळत आहे. किमान महाराष्ट्रात तरी हीच परिस्थिती आहे. जूनच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस आहे. तर आतापर्यंत अडीच महिन्यात एकूणच राज्यात २१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील पावसाची आकडेवारी सध्या अतिरिक्त श्रेणीत आहे. जुलैअखेर काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणत्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस ?

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली तर काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे. तरीही पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरी झाला आहे. राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई शहर जिल्हा, सातारा, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे.

हेही वाचा : आमदार विकला गेला तर भररस्त्यात फटके मारणार, कोण म्हणाले?

राज्यातील हवामानाची स्थिती काय?

राज्यात येत्या शनिवारपासून पाऊस पुन्हा एकदा पूर्णपणे सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. पाऊस पूर्णपणे सक्रीय होण्यासाठी स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्र, तसेच पश्चिम बंगालच्या गंगेच्या खोऱ्यामध्ये दोन प्रणाली निर्माण होत असून यामुळे महाराष्ट्रात पावसाला पुन्हा चालना मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात कर्नाटक किनारा आणि गोवा किनाऱ्याजवळ ही प्रणाली निर्माण होत असून ती उत्तरेकडे सरकत आहे. ही स्थिती पाऊस पूर्णपणे सक्रीय होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

राज्यातील रायगड जिल्ह्याला २५ ऑगस्टपर्यंत म्हणजे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याला २४ आणि २५ ऑगस्टला म्हणजे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात २३ ते २४ ऑगस्ट असे दोन दिवस यलो अलर्ट तर २५ ऑगस्टला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांमध्ये शनिवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा : Chandrashekhar Bawankule: बदलापूरवरून महाराष्ट्राला मणिपूर करण्याचे मविआचे मनसुबे – बावनकुळे

पाऊस कुठे, कधी आणि कसा ?

महाराष्ट्रासह गुजरातमध्ये जोरदार अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या आठवड्यात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस राहील. विशेषतः कोकण आणि गोव्यातील काही भागांत पुढील सात दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यात २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather prediction how much rainfall in maharashtra within last two and half month rgc 76 css