अकोला : पूर्व तटीय रेल्वे येथे ‘दाना’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. भुसावळ विभागातून सुटणाऱ्या पाच गाड्यांचा त्यामध्ये समावेश आहे. रेल्वे गाड्यांमध्ये सध्या प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड अडचण होत आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांवर चक्रीवादळाचा विपरीत परिणाम झाला. गाडी क्रमांक २२९७३ गांधीधाम – पुरी एक्सप्रेस गांधीधाम येथून २३ ऑक्टोबर रोजी सुटली नाही. त्यामुळे 24 ऑक्टोबरला ही गाडी मध्य रेल्वेच्या स्थानकांवर येणार नाही. गाडी क्रमांक २२८६५ लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्सप्रेस २४ ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रद्द केली. गाडी क्रमांक २०८२४ पुरी – अजमेर एक्सप्रेस २९ ऑक्टोबर रोजी पुरी येथून रद्द, गाडी क्रमांक २२९७४ पुरी – गांधीधाम एक्स्प्रेस २६ ऑक्टोबर रोजी पुरी येथून रद्द आणि गाडी क्रमांक ०९०६० ब्रह्मपूर – उधना विशेष २५ ऑक्टोबर रोजी ब्रह्मपूर येथून रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना ही माहिती लक्षात ठेवावी आणि त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा…थंडीची चाहूल… राज्यात दिवाळीपासून थंडीची तीव्रता वाढणार…

रेल्वे गाड्या ‘शॉर्ट टर्मिनेट’ केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसाय

भुसावळ विभागातील बडनेरा येथील ‘यार्ड रीमॉडेलिंग’च्या कार्यासाठी ‘पूर्व-नॉन इंटरलॉकिंग’ दरम्यान काही प्रवासी गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या नियोजित शेवटच्या व गाडी सुटण्याच्या स्थानकांमध्ये बदल केला. १९ ऑक्टोबरपासून प्रवासी गाड्यांचे ‘शॉर्ट टर्मिनेशन’करण्यात आले असून ते २५ ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. ०१२१२ नाशिक रोड – बडनेरा मेमू विशेष मूर्तिजापूरपर्यंत, ०१३६५ भुसावळ – बडनेरा मेमू मूर्तिजापूरपर्यंत, ०१३६८ नरखेड – बडनेरा मेमू नवी अमरावती, ०१३७० नरखेड -बडनेरा मेमू नवी अमरावती येथे ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात आली. ‘पूर्व-नॉन इंटरलॉकिंग’ कामादरम्यान प्रवासी गाड्या सुटण्याच्या स्थानिकात बदल केला. ०१२११ बडनेरा-नाशिक रोड मेमू विशेष मूर्तिजापूर, ०१३६६ बडनेरा -भुसावळ मेमू मूर्तिजापूर येथून आपल्या नियोजित वेळेत सुटत आहे. ०१३६७ बडनेरा -नरखेड मेमू नवी अमरावती, ०१३६९ बडनेरा -नरखेड मेमू नवी अमरावती येथून आपल्या नियोजित वेळेत सुटत आहे. या बदलामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.