नागपूर: केरळवर निसर्ग कोपला, वायनाडमध्ये ढगफुटी झाली. तेथे झालेल्या भूस्खलनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या दुर्घटनेनंतर देशभरातून मदतीचे हात तेथे पोहोचत आहेत. यापैकी एक मदतीचा हात नागपूरकर डॉक्टरचाही आहे. वायनाडमध्ये तातडीने वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय पथकात नागपूरकर डॉ. अजय सगदेव यांचा समावेश आहे.

केरळमधील वायनाड परिसरात भूस्खलनातील मृत्यूंची संख्या २२२ वर पोहोचली आहे. दरम्यान निसर्ग प्रकोपानंतर तेथे मदतीसाठी वायनाड या जिल्याचे मुख्यालय कल्पेटटा येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे पद्मश्री डॉ. अजय सगदेव यांच्या नेतृत्वात डॉक्टर आणि परिचारिकांची चमू कार्यरत आहे. डॉ. सगदेव हे मूळचे नागपूरचे आहे. या चमूकडूनही तेथील जखमींवर उपचार केले जात आहेत. दरम्यान डॉ. सगदेव यांनी नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार विश्वास इंदूरकर यांच्याशी भ्रमनध्वनीवर संवाद साधून ही माहिती दिली. डॉ. सगदेव म्हणाले, अद्यापही सुमारे १३० ते १५० जण बेपत्ता आहे. येथे लष्कराने एका रात्रीतून पूल उभा केल्यामुळे मदतकार्याला गती मिळाली. या लष्करी मदत तुकडीमध्ये अहमदनगरमधील एक महिला मेजर अधिकारी सहभागी होती. अद्यापही तेथील प्रत्यक्ष घटनास्थळी जाण्याकरिता प्रशासनाने बंदी घातली आहे. येथील ढगफुटी मध्यरात्री झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. डोंगरांच्या पायथ्याशी जे दोन-तीन गावे होती ते पूर्णपणे आता चिखलाने भरलेले मैदान झाल्याचे त्यांनी नमूद केले. डोंगराच्या पायथ्याशी रिसॉर्ट आणि घरे बिना परवानगीने उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर : आता मंगळागौरींच्याही स्पर्धा, प्रशिक्षणाचीही सोय, काय आहे हा उपक्रम ?

ढगफुटीमुळे आणि त्याचबरोबर डोंगरावरून आलेल्या मातीमुळे मृतदेहांचे अक्षरश: तुकडे तुकडे झालेले आढळून आले. या अवस्थेततील मृतदेहांचे तुकडे एका टोपलीत गोळा करून त्यांचा अंत्यसंस्कार करावा लागला. या कामी ‘सेवा भारती’ या सामाजिक संस्थेच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला. सुमारे शंभरहून अधिक मृतदेहांचा अंत्यसंस्कार सेवाभारतीच्या कार्यकर्त्यांनी केला. या कामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या चमूनीही सहकार्य केले. या निसर्ग प्रकोपामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या औषधोपचार व मदतीकरिता केरळ भारती मजदूर संघ (बी. एम. एस.)च्यावतीने सुमारे ५० लाख रुपये किमतीचे जीवनरक्षक व इतर उपयोगी औषधे स्वतःहून उपलब्ध करून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रती कामगार संघटनेने आपली सामाजिक जाणीव कृतीतून दाखवून दिली.

हेही वाचा – चंद्रपूर दीक्षाभूमीचे रूपडे पालटणार, ५७ कोटींचा निधी मंजूर; ‌‌असा होणार कायापालट

डॉ. सगदेव यांच्याबद्दल…

डॉ. सगदेव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणेतून केरळ येथील वायनाड कल्पेटटा येथील स्वामी विवेकानंद मिशनच्या कार्यासाठी एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर रवाना झाले. आणि गेल्या ४४ वर्षांपासून ते त्याच ठिकाणी आदिवासींच्या सेवेत सदर केंद्राच्या वतीने आजही कार्यरत आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी आदिवासी भागातील सिकलसेल समस्यांच्या कामाबाबत त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.