लोकसत्ता टीम

वर्धा : सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थिनीने आज दुपारी आत्महत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षांत शिकणाऱ्या पूजा हिने याच महाविद्यालयच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना कळताच तिच्या नागपूरस्थित पालकांनी महाविद्यालयात पोहचत संताप व्यक्त केला. मुलीच्या आत्महत्येने त्यांचा एकच आक्रोश सुरू झाला. त्याच रागातून त्यांनी महाविद्यालयात तोडफोड केली. चौथ्या मजल्यावरून खाली उडी घेतल्यावर रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी इथेच उपस्थित अधिष्ठाता डॉ. अभय गायधने यांनी तिला उचलून रुग्णालयात आणले. उपचार सुरू केले. पण तोपर्यंत तिचा जीव गेला होता.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललित कुमार वाघमारे हे म्हणाले की आत्महत्येमागे काय कारण आहे हे पुढे आलेले नाही. मात्र, चौकशी केल्या जाईल. तसेच पोलीस यंत्रनेस सहकार्य करू, असे कुलगुरू म्हणाले. तर विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. उदय मेघे यांनी पालकांचा संताप तूर्तास शांत झाला आहे. पण प्रकरण गंभीर व दुर्दैवी आहे. असे विद्यापीठात आजवर कधीच झाले नाही. आम्ही सर्व ती काळजी घेत असतो.

आणखी वाचा-सोन्याचे दर पुन्हा ७० हजार पार…हे आहे आजचे दर…

प्राप्त माहितीनुसार पूजाची उद्यापासून परीक्षा सुरू होणार होती. ती हॉस्टेलला न राहता नागपुरातून घरून अप-डाउन करीत शिक्षण घेत होती. असे शिक्षण घेण्यास परवानगी असते काय, अशी विचारणा केल्यावर पूजावर काही उपचार सुरू होते. त्यासाठी तिला तिच्या घरी राहण्याची व घरून वैद्यकीय महाविद्यालयात येण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. आज पण ती ड्राइव्हरसह स्वतःच्या गाडीने महाविद्यालयात पोहचली. ड्राइव्हर जेवायला गेला. तर ही महाविद्यालयात आली. त्यानंतर असे काय घडले की तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, हे कळायला मार्ग नसल्याचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले.

आणखी वाचा-भाजपच्या मनुवादी वृत्तीचा काँग्रेसकडून निषेध, नागपुरात आंदोलन

परीक्षा सुरू होत असतांनाच हा प्रकार घडल्याने वैद्यकीय परिसर धास्तावून गेला आहे. परीक्षेचे दडपण, आजार की काही वाद यातून ही आत्महत्या झाली, याबाबत तर्क वितर्क व्यक्त होत आहेत. मेघे अभिमत विद्यापीठाचा हॉस्टेलसह विस्तीर्ण परिसर असून सर्व ती सुरक्षा २४ तास घेतल्या जात असल्याचा महाविद्यालय प्रशासनाचा दावा आहे. आत्महत्येपूर्वी पूजा हिचा मैत्रिणी किंवा कार्यालयीन कर्मचाऱ्यांशी काही संवाद झाला होता का, काही अडचण किंवा समस्या असल्याचे ती बोलली होती का? या पैलूने विद्यापीठ अधिकारी प्राथमिक विचारपूस करीत आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर काही बाबी स्पष्ट होतील, असे सांगण्यात आले