यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधात वृत्तवाहिन्यांवरून विविध आशयांच्या निराधार बातम्या पसरविल्या जात आहेत. विरोधकांनी माध्यमांना हाताशी धरून आपल्या विरोधात हे षडयंत्र रचल आहे. मात्र ‘आपण कोणत्याही प्रगती पुस्तकात नापास झालो नाही’, असे स्पष्ट करत माध्यमांनी कोणतीही खातरजमा न करता आपल्या विरोधात सुरू केलेला हा प्रकार थांबवावा, अशी विनंती आमदार संजय राठोड यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…

प्रसारमाध्यमांमध्ये आपल्या विरोधात ‘प्रगती पुस्तकात नापास’, ‘मंत्रिमंडळातून पत्ता कट’ आणि ‘संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून डच्चू’ अशा आशयाच्या बातम्या दाखवल्या जात आहेत. हा प्रकार जिव्हारी लागला असून, मनाला प्रचंड वेदना होत असल्याचे संजय राठोड यांनी म्हटले आहे. शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख, आमदार, मंत्री असा प्रवास केला आहे. २००४ पासून पाच वेळा दिग्रस मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. प्रत्येकवेळी मताधिक्य वाढले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक एक लाख ४४ हजार मते आपल्याला मिळाली आहेत. विविध खात्याचा मंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मतदारसंघासाठी आणि जिल्ह्यासाठी सातत्याने विकासकामे आणि मोठा निधी खेचून आणला. बंजारा समाजाचे तीथक्षेत्र असलेल्या पोहरादेवी येथे जवळपास ७०० कोटी रूपयांची विकासकामे केली. येथील ‘बंजारा विरासत’ या नंगारा वास्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस अजित पवार हे पाचवेळा यवतमाळ जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना आले. माझे प्रगती पुस्तक वाईट असते तर त्यांनी मला भरभरून निधी दिला असता का?, माझे काम लोकाभिमूख नसते तर सलग पाच वेळा जनतेने मला निवडून दिले असते काय?, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कामाचे कौतुक केले असते काय? असे प्रश्न संजय राठोड यांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा >>> ‘झीनत’ला परत आणण्यासाठी वनविभागाचे जोरदार प्रयत्न; नेमक झालं काय?

आपल्या नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या. यवतमाळ जिल्हा परिषद, सहा पंचायत समित्या आणि पाच नगरपालिकांच्या अध्यक्षपदावर शिवसेना विराजमान झाली, असे ते म्हणाले. २०२१ मध्ये आपल्या विरोधात जे आरोप झाले होते, त्यात मी स्वतःहून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या चौकशीत मला क्लीन चिट मिळाली. त्यानंतरच, २०२२ मध्ये पुन्हा मंत्री म्हणून समावेश झाला. आपल्यावर आजपर्यंत कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही, असे ते म्हणाले. ‘मी माझ्या राजकीय कारकिर्दीत प्रामाणिकपणे जनतेसाठी काम केले आहे, त्यामुळे ‘नापास’ हा शब्द माझ्यासाठी अस्वीकार्य आहे’, असे ते म्हणाले. आपण गेल्या ३० वर्षात राबविलेल्या सामाजिक उपक्रमांची, आमदार, मंत्री म्हणून केलेल्या विकासकामांची खातरजमा न करता माध्यमांनी आपल्या कार्यकर्तृत्वाला कमी लेखू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच माझे नेते आहेत, आणि आपल्या मंत्रीपदाबाबत ते निर्णय घेतील, असेही आमदार संजय राठोड यांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla sanjay rathod appeal media not spread baseless news against me on news channels nrp 78 zws