Raj Thackeray Press Conference: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या विधानसभेच्या तयारीसाठी राज्यव्यापी दौरा करत आहेत. विदर्भ दौऱ्यावर असताना आज त्यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. “महाराष्ट्राची आजची जी स्थिती आहे, ती आजपर्यंत कधी पाहिली नव्हती. विधानसभेच्या तिकीट वाटपावरून महायुती आणि मविआमध्ये हाणामाऱ्या सुरू होतील, हे मी सांगितले होते. याची झलक लोकसभेला पाहायला मिळाली. त्यामुळे आमच्यासाठी आता वातावरण पोषक आहे”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. यावेळी लोकसभेच्या निकालावरही त्यांनी भाष्य केले.

लोकसभेला अँटी मोदी आणि अँटी शाह मतदान झाले

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मागच्या पाच वर्षात राज्यात ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला, त्याला लोक कंटाळलेले आहेत. लोकसभेला ४०० पारची घोषणा आणि संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे मुस्लीम आणि दलित समाजाने एकगठ्ठा मतदान केले. हे मतदान अँटी मोदी आणि अँटी शाह असे होते. ते काही उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी मतदान नव्हते. ती वाफ आता निघून गेली आहे. त्यामुळे विधानसभेला गोष्ट वेगळी आहे. कारण पाच वर्षांपूर्वी मतदारांबरोबर जी प्रतारणा झाली, ते लोक विसरलेले नाहीत. या गोष्टीचा राग विधानसभेच्या निवडणुकीला नक्की काढतील. हे मला दौऱ्याच्या माध्यमातून दिसत आहे.”

हे वाचा >> “मला एका गोष्टीचं दु:ख होतंय की…”, शरद पवारांनी मांडली भूमिका; पुण्यात भर पावसात आंदोलन, उपस्थितांना दिली शपथ!

शिंदे आणि फडणवीस यांच्याविरोधात उमेदवार देणार

शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात यावेळी उमेदवार देणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर राज ठाकरे म्हणाले की, वरळी विधानसभेत आमची ३७ ते ३८ हजार मते आहेत. मागच्यावेळी आम्ही निवडणूक लढवली नाही. मात्र यावेळी आम्ही वरळी विधानसभेत उमेदवार देणार आहोत. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात आम्ही सर्व जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. त्यामुळे शिंदे आणि फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार देऊ, असे त्यांनी जाहीर केले.

हे ही वाचा >> ‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…

राज ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात किती जागा लढवायच्या याबाबत पक्ष पातळीवर सर्व्हे सुरू आहे. २००९ साली आम्ही सव्वा दोनशे जागांवर निवडणूक लढविली होती. यावेळीही किमान तेवढ्याच जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.