नागपूर : देशात अवघ्या सहा महिन्यांत ९५ वाघ मृत्युमुखी पडले. यात मध्य प्रदेश आघाडीवर असून त्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तराखंड आहे. एप्रिलमध्ये जाहीर झालेल्या व्याघ्रगणनेच्या आकडेवारीनुसार २०१८ पासून सुमारे २०० वाघ वाढल्याचे समोर आले. ‘प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, २०१८ पासून देशात २०० वाघ वाढले. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी २५ जूनपर्यंत देशभरात ९५ पेक्षा अधिक वाघ मृत्युमुखी पडले. यातील सर्वाधिक २४ वाघ मध्य प्रदेश, १९ महाराष्ट्रात, तर उत्तराखंडमध्ये १४ वाघांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले. मध्य प्रदेशात झालेल्या वाघाच्या शिकारीनंतर केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने भारतातील अनेक राज्यांना ‘रेड अलर्ट’ दिला आहे. त्यातही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प, अधिवास असणारा परिसर शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास २०१७ नंतर शिकार आणि शिकाऱ्यांचा मागोवा घेणे बंद झाले. त्याचाच फायदा शिकारी घेत आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी झालेला वाघाचा मृत्यू संशयास्पद होता. आता तर सहा महिन्यांतील वाघांची आकडेवारी समोर आली. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पच नाही तर व्याघ्रकेंद्रित सर्वच क्षेत्रांवर गांभीर्याने लक्ष ठेवावे लागणार आहे. पहिल्या सहा महिन्यांत झालेले वाघांचे मृत्यू हे प्रकल्पाच्या आत जितके आहेत, तितकेच ते व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरदेखील आहेत.