वर्धा : ज्या विधानसभा क्षेत्रात लीड मिळेल तिथेच भाजप आमदारास पुन्हा तिकीट देवू, असा तंबीवजा इशारा भाजप नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत दिला होता. मात्र होत्याचे नव्हते झाल्याने आता हे सूत्र तर राहणार नाहीच, पण आहे त्यांना पण सांभाळून घ्यावे लागेल, अशी भाजप वर्तुळत चर्चा सूरू झाली आहे.

विधानसभा क्षेत्रनिहाय जबाबदारी देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांना कामाला लावले होते. वर्ध्यात डॉ. पंकज भोयर, आर्वीत दादाराव केचे, हिंगणघाट येथे समीर कुणावर तर धामणगावला प्रताप अडसड यांना रामदास तडस यांना विजयी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

हेही वाचा – चंद्रपूर : लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला प्रचंड मताधिक्य

मोर्शीत अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार तर देवळीत विरोधी आमदार असल्याने संघटना प्रमुख राजेश बकाने यांच्या खांद्यावर जबाबदारी आली. मात्र केवळ भोयर व देवेंद्र भुयार हेच काठावर पास झालेत. वर्धा मतदारसंघात सात हजाराने तडस मागे असून देवळीत ४० हजार, हिंगणघाटला १५ हजार, धामणगाव येथे १७ हजार, आर्वीत १४ हजाराने तडस मागे पडले. तर मोर्शी या एकमेव विधानसभा क्षेत्रात तडस यांना १२ हजाराचे मताधिक्य मिळाले. अमर काळे यांना देवळी, आर्वी, हिंगणघाट, धामणगावने भरभरून साथ दिल्याची आकडेवारी आहे.

एकट्या देवळीने काळे यांच्या विजयाचा भक्कम पाया रचला. हे क्षेत्र तडस यांचे गढ समजल्या जाते. येथील पालिकेत त्यांचे कायम वर्चस्व राहले. तसेच अन्य संस्था त्यांनी ताब्यात ठेवल्या. तसेच विविध निधीचा अक्षरशः रतीब ओतून त्यांनी देवळीस शहराचे रुपडे दिले. मात्र या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील काहींच्या वागणुकीने सुरुंग लावल्याचे म्हटल्या जात आहे. तसेच येथील काँग्रेसचे दिग्गज आमदार रणजित कांबळे यांनी काळे यांची उमेदवारी मनावर घेत काम केल्याची पावती आता त्यांनाच दिल्या जाते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पवार गट ही जागा काँग्रेससाठी सोडायला तयार नव्हते. त्यांचा हट्ट पण सक्षम उमेदवाराची टंचाई पाहून पेचात पडलेल्या शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांना आमदार कांबळे यांनीच अमर काळे यांचा पर्याय सर्वप्रथम सुचविल्याची माहिती पुढे आली. तुम्ही अमर काळे यांचा विचार का करीत नाही, (व्हाय डोण्ट यू थिंक अबाऊट अमर काळे?) असा प्रश्न त्यांनी संयुक्त बैठकीत केला होता. कांग्रेसच्या काळे यांनी राष्ट्रवादीच्या तुतारीवर लढण्याचा डाव हा कांबळे यांनी खेळला व तो यशस्वी झाला. खुद्द काळे हे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीतर्फे लढण्यास एका पायावर तयार झाले. ईथे आता कसलीच अडचण ( प्रामुख्याने आर्थिक ) येणार नाही, असे ते बोलून पण गेले होते. झाले तसेच. देवळी विधानसभा क्षेत्रात काळे यांच्या उमेदवारीचा उगम तसेच विजयाचा पाया रचल्या गेला, हे आता दिसून आले आहे. हिंगणघाट येथे तडस प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी लोकं जुळविण्याची कसरत होती. आमदार कुणावार यांचे सहकारी सभेसाठी गर्दी गोळा करण्यास फिरले. पण गाडीत बसायला उत्सुकता दिसून येत नव्हती. तेव्हा इतर नेत्यांचे जाऊ द्या पण कुणावार यांच्याकडे पाहून तरी सभेसाठी चला, अशी विनंती झाल्यावर गर्दी जमली. मात्र राग निघालाच आणि हिंगणघाट येथे तडस चांगलेच माघारले.

हेही वाचा – अमरावती : सरपंच ते खासदारकीचा प्रवास! बळवंत वानखडेंच्या राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख

आर्वीत सुरवातीस काळे व तडस नेक टू नेक मतं घेत होते. इथेच मोदी यांची पण सभा घेण्यात आली. मात्र घरचा माणूस खासदार होतोय म्हणून आर्वीकरांनी काळे यांना साथ दिल्याचे दिसून आले. आर्वी, हिंगणघाट, देवळी व धामणगाव येथे भरभरून मते मिळाल्यानेच काळे यांची नौका पार झाली तर तडस यांचे जहाज बुडाले.