लोकसत्ता टीम

यवतमाळ : ‘भाजपाचा कार्यकर्ता म्हटलं की, गावातील लोकं जोडे मारतात. आपली सत्ता असून गावकऱ्यांना अत्यंत खराब व दुषित पाणी प्यावे लागत आहे’, अशी खंत व्यक्त करून, ‘आम्ही पितो ते गढूळ पाणी तुम्ही पिऊन दाखवा’, असे आव्हान देत एका कार्यकर्त्याने राळेगावचे भाजप आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांना चांगलेच फैलावर घेतले. कार्यकर्त्यांचे हा अवतार बघून यावेळी आमदार अशोक उईके अक्षरश : निरुत्तर झाले होते. हा व्हिडीओ समाज माध्यमांतून सार्वत्रिक झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव हा आदिवासी राखीव मतदारसंघ आहे. गेल्या दोन टर्मपासून भाजपचे प्रा. डॉ. अशोक उईके हे येथून आमदार आहेत. राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कोच्ची या गावातील लोक सध्या भीषण जल समस्येला तोंड देत आहेत. शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज गढूळ पाणी पिण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे. जे पाणी जनावराच्याही पिण्याच्या लायकीचे नाही असे पाणी पिण्यास गावकऱ्यांना भाग पडत आहे. या गावात गेल्या दोन वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची यंत्रणा उभी करण्याचे काम चालू आहे. पण हे काम अद्यापही अपूर्णच आहे.

आणखी वाचा-शरद पवारांवर अमित शहांच्या टिकेने अजितदादा गटाचे आमदार व्यथित!

प्रशासन या समस्येकडे दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यानी केला आहे. त्यामुळे कोच्ची येथील सचिन गोफने व शंकर जवादे हे तरूण कार्यकर्ते गढूळ पाणी घेऊन राळेगाव येथे आमदार प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात पोहचले. यावेळी सचिन गोफने यांनी आमदारांसमोर गावकऱ्यांची पाण्याची समस्या दरबारात मांडली. बाटलीत आणलेले हे गढूळ पाणी शंकर यांनी चक्क आमदारांसमोर पिऊन दाखविले. त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आमदार उईके व अधिकाऱ्यांना हे गढूळ पाणी पिण्याचे आव्हान दिले. मात्र उपस्थित आमदार अशोक उईके व अधिकाऱ्यांनीही हे पाणी पिण्याची हिम्मत दाखवली नाही. कार्यकर्त्याचा हा अवतार पाहून आमदार मात्र निरुत्तर झाले.

आणखी वाचा-“मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र आहे का…?”, माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा सवाल

यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यासह सर्वच तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामाचा फज्जा उडाला आहे. ‘हर घर पानी, हर नल पानी’ या पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेचा संपूर्ण जिल्ह्यात नियोजनाअभावी पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राळेगाव तालुक्यात भाजपा आमदारांना गावकऱ्यांच्या तीव्र रोषाला समोर जावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील जलजिवन मिशनच्या कामात सुधारणा होवून नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुषित पाण्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो अशा जलजन्य आजाराची साथ सुरू आहे. प्रशासनाने गढूळ पाणी पाजून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकण्यापेक्षा यंत्रणेत सुधार करण्याची मागणी आहे.