लोकसत्ता टीम

बुलढाणा: तब्बल तीनशे पंधरा वर्षांची वारीची आणि अध्यात्मिक परंपरा असलेल्या आणि श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रथम प्रवेशाचा मान असलेल्या मुक्ताईच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केले. तब्बल शंभर दिंड्यांचा सहभाग, रथ ओढणारी खिल्लारी बैलांची आकर्षक जोडी, रथाला करण्यात आलेला फुलांचा साज, विठ्ठल-रुखमाई आणि आदिशक्ती मुक्ताईमातेचा जयघोष करणारे शेकडो वारकरी, विदर्भ-खान्देश-मराठवाडा ते मध्यप्रदेशातील हजारो भाविकांची मांदियाळी, असा पायदळ वारीचा थाट आहे.

आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या आषाढी वारीने आज १८ जूनला कोथळी येथील जुन्या मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. यंदा प्रथमच या आषाढी वारी पालखीत आदिशक्ती मुक्ताईच्या ९ किलो वजनाच्या चांदीच्या पादुका व चोपदाराची काठी सुद्धा चांदीची असणार आहे. या पादुका लोकसभागातून तयार करण्यात आल्या आहेत. जुने मंदिर कोथळी येथून प्रस्थान होऊन श्रीक्षेत्र मुक्ताईनगर नवीन मंदिर येथे पालखी विसावणार आहे. १९ जून रोजी सकाळी पुढच्या प्रवाससाठी मार्गस्थ होणार आहे. दसरखेड येथे साठे परिवार आणि गावकऱ्यातर्फे होणाऱ्या आदर तिथ्याचा स्वीकार केल्यावर पालखीचा पहिला मुक्काम मलकापूर येथे राहणार आहे. तेथील मराठा मंगल कार्यालय येथे पालखी आणि वारकरी विसावा घेणार आहे. मलकापूर येथील मुक्ताईचे निस्सीम भक्त असले पानसरे परिवार यजमान आहे.

आणखी वाचा-पोलीस भरती : अकोला जिल्ह्यात १९५ पदांसाठी २१,८५३ उमेदवार मैदानात; १७ दिवस चालणार…

मुक्ताबाईंचा प्रवेश झाल्यावरच इतर संताना प्रवेश

यावर्षी पालखी सोहळ्याला एक आगळे वेगळे रूप मिळाले आहे. भाविकांमध्ये फार मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे यावर्षी पालखी सोहळ्यामध्ये जवळपास १०० दिंड्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये या दिंड्यांची संख्या अधिक पटीने वाढणार आहे.

वारकरी परंपरेतील मुख्य उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रासह देशातून निघणारे पालखी सोहळे. या पालखी सोहळ्यांमध्ये प्रमुख मानाचे पालखी सोहळे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ एकनाथ महाराज समर्थ, सद्गुरु गजानन महाराज पालखी सोहळ्याचा समावेश आहे. संत मांदियाळी मध्ये एकमेव स्त्री संत म्हणून ज्या पालखी सोहळ्याला मानाचे स्थान आहे,असा सोहळाम्हणजे मुक्ताई पालखी सोहळा आहे.

आणखी वाचा-बापरे! जागा ६६ अन् उमेदवार ९ हजार; पोलीस भरतीचे दिव्य कोण पेलणार?

आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी ही पंढरपूर मध्ये सर्वप्रथम प्रवेश करणारा पालखी सोहळा आहे. आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी वाखरी येथे सामोरे गेल्याशिवाय इतर संत पंढरपूर मध्ये प्रवेश करत नाहीत, एवढा मान आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला आहे. तसेच सर्वात आधी निघणारा पालखी सोहळा सर्वात लांब पल्याचा पालखी सोहळा आणि तब्बल सात जिल्ह्यांमधून प्रवास करणारा पालखी सोहळा म्हणून या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याची ख्याती आहे.

पालखीच्या पुढील मार्गावरील गावे आणि शहरातील, भाविकांनी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान संस्थानचे अध्यक्ष अॅड रवींद्रभैय्या पाटील , पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे सह आदिशक्ती मुक्ताबाई फडावरील समस्त वारकऱ्यांनी केलेले आहे.

मध्यप्रदेशातील बैल जोडीला मान

मध्य प्रदेशातील बरामपुर जिल्ह्यातील नाचणखेडा येथील राजेश प्रकाश पाटील यांच्या बैल जोडीला रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. गत अकरा वर्षापासून हा मान कायम आहे. आदीशक्तीची पालखी राज्यातील सर्वात लांब पल्ल्याची पालखी आहे. पंढरपूर ला जाताना पालखी सात जिल्ह्यातून प्रवास करते. पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, जुने मुक्ताई मंदिराचे व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांनी ही माहिती दिली आहे.