नागपूर : विरोधकांच्या महाविकास आघाडीत (मविआ) जागा वाटपाचे त्रांगडे निर्माण झाले असून छोट्या पाच पक्षांनी आपल्या वाट्यास न आलेल्या मतदारसंघांतही उमेदवारी दाखल केली आहे. उद्यापर्यंत आमच्या जागा सुटल्या नाहीत तर मैत्रीपूर्ण लढतीचा किंवा बंडखोरीचा पर्याय आमच्यासमोर असल्याचे सांगत या छोट्या पक्षांनी ‘मविआ’मध्ये बंडाचा झेंडा फडकवला आहे. नागपुरातही या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री वंचित बहुजन आघाडीशी चर्चा करत असून बंडाच्या तयारीत आहेत.

उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

काँग्रेस नेते, माजी मंत्री अनीस अहमद यांनी उमेदवारी वाटपावरून स्वपक्षावर टीका केली आहे. पक्षाच्या तिकीट वाटपामध्ये एकाच समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व देत दुसऱ्या समाजाला डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी बंडाचा इशारा दिला आहे. अहमद वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती अहमद यांनी दिली.

हेही वाचा – वर्धा : प्रजननकाळच बिबट्यांच्या जीवावर उठतोय, जंगल सोडून रस्त्यावर येतात, आणि….

हलबा, मुस्लीम विरोधाचा काँग्रेसला फटका?

काँग्रेसने शहरात विकास ठाकरे (पश्चिम नागपूर), नितीन राऊत (उत्तर नागपूर), बंटी शेळके (मध्य नागपूर), प्रफुल्ल गुडधे (दक्षिण-पश्चिम नागपूर), गिरीश पांडव (दक्षिण नागपूर) या उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर मध्य नागपुरातील काँग्रेसच्या नेत्यांनी थेट दिल्ली गाठत पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. यावेळी मध्य नागपूरमधील हलबा आणि मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी केवळ एकाच समाजाला प्रतिनिधित्व देत असल्याची टीकाही केली. मात्र, त्यानंतरही पक्षश्रेष्ठी मध्य नागपुरातील उमेदवारीवर ठाम असल्याने अखेर अनीस अहमद यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा – “दादाराव केचे आर्वीतून उमेदवारी अर्ज भरणार, पण…”, सुधीर दिवे म्हणाले…

अनिस अहमद यांचा नेमका आरोप काय ?

उमेदवारी अर्ज भरायला अवघे दोन दिवस उरलेले असल्याने सर्वच पक्षांकडून जागा वाटप जलद गतीने सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील वाद संपत नसल्याने त्यांचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. दरम्यान, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी स्वंतत्र लढणार असल्याने त्यांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात अहमद यांचे नाव नाही. पण अहमद यांनी पक्षावर आरोप केले आहेत. मध्य नागपूरमधून निवडणूक लढणार आहे. कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढणार हे अद्याप ठरले नाही. वंचितसोबत चर्चा सुरू असून अद्याप पक्षप्रवेश केलेला नाही. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. मात्र, जागा वाटपात मोठा घोळ झाला आहे. मी कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही. परंतु, एकाच समाजाला उमेदवारी देणे चुकीचे आहे असा आरोप अनीस अहमद यांनी केला.