नागपूर : जिल्हाधिकारी म्हटले की सुटाबुटातला, सर्व सामान्यांना आपल्यातील न वाटणारा अधिकारी असा साधारणपणे समज आहे. त्यांची कार्यशैली हाच समज अधिक बळकट करणारी ठरते. मात्र काही जिल्ह्याधिकारी याला अपवाद असतात. नागपूरचे जिल्ह्याधिकारी डॉ. विपीन इटनकर यापैकीच एक. रविवारी त्यांनी शेतकऱ्यांना धान रोवणीची नवी पद्धत समजावून सांगण्यासाठी थेट शेतात उतरून ट्रॅक्टर चालवला, रोवणीही करून दाखवली.
हेही वाचा – रेल्वे पुलास मिळाली मंजूरी अन् गावकऱ्यांनी काढली खासदारांची मिरवणूक
जिल्ह्यामध्ये जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. यंदा जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन प्रशासनाने शेतकऱ्यांना केले आहे. ती कशी करावी यासाठी रविवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे राम दशरथजी लांजेवार यांच्या शेतावर गेले. तेथे त्यांनी शेतकऱ्यांना नव्या रोवनी पद्धतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्वतः धान बांधीत उतरून रोप लावणी केली. ट्रॅक्टर चालवून चिखलणीकरण केले. भाताची रोवणी करण्यापूर्वी शेताची विशिष्ट पद्धतीने मशागत करणे आवश्यक असते. याला चिखलणीकरण म्हणतात. पूर्वी बैलांच्या मदतीने हे चिखलणीकरण करण्यात येत होते. आता ट्रॅक्टरच्या मदतीने करण्यात येते.