नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या व गैरप्रकाराला बळ देणाऱ्या चार शिक्षकांना नागपूर विभागीय कार्यालयाने निलंबित केले तर दोघांची प्रशासकीय चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीय विभागीय शिक्षण मंडळाने सहा शिक्षकांच्या निलंबनासाठी शिफारस केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. तसेच जे शिक्षक व कर्मचारी कॉपी करण्यासाठी मदत करतील त्यांना बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर शिक्षण मंडळाने यावर्षी पहिल्यांदाच अशी धडाकेबाज कारवाई केली.

दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षांमधील कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळासह संपूर्ण प्रशासन कामाला लागले आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षण मंडळ, शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनही सक्रिय आहे. प्रत्येक स्तरावर भरारी पथके तैनात केली आहेत. असे असताना काही केंद्रांवर कॉपीचे प्रकार घडले. ज्या केंद्रावर कॉपीचे प्रकार घडले, त्या केंद्रांच्या ६ शिक्षकांना निलंबित करण्याची शिफारस केल्याची माहिती विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी दिली. यामध्ये वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. तूर्तास गडचिरोली आणि चंद्रपूर येथील चार शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील दोन शिक्षकांची प्रशासकीय चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते.

कॉपीमुक्त अभियानासाठी यंदा शिक्षण मंडळासह महसूल विभागातील भरारी पथके प्रत्येक परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांनीही कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गैरप्रकार करणाऱ्या चार शिक्षकांना निलंबत करण्यात आले असून दोघांची चौकशी सुरू आहे. चिंतामण वंजारी, अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ, नागपूर.

Story img Loader