रागाच्या भरात किंवा कळत नकळत हातून घडलेल्या गुन्ह्यांमुळे कारागृहात बंदिस्त असलेल्या १२० बंदिवानांच्या १८९ मुला-मुलींना ‘गळाभेट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेट घडण्यात आली. या हळव्या भेटीत झालेले भावनिक संवाद ऐकून दगडी कारागृहाच्या रुक्ष भिंतीही गहिवरल्या.

हेही वाचा >>> विदर्भातील चंद्रपूर, बुलढाणा लोकसभा मतदार संघ जिंकण्याचे लक्ष्य निश्चित – बावनकुळे

सध्या कारागृहात असलेले कैदी भविष्यात चांगले नागरिक म्हणून समाजात परत जावे, त्यांना कुटुंबाची आणि कर्तव्याची जाणीव व्हावी, या उद्देशाने कारागृह प्रशासाने बंदिजन व त्यांच्या मुलांची गळाभेट घडवून आणली.माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी १ सप्टेंबर १९६९ रोजी कारागृह विभागास ध्वज प्रदान केला होता. त्यादिवसापासून राज्यात सर्वत्र कारागृह विभागाचा ध्वजदिन साजरा करण्यात येतो. करोना काळात बंदिवानांना आपल्या मुलामुलींना भेटता आले नव्हते. मात्र, यंदा कारागृह विभागाच्या या उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या पालकांशी भेटता आले. या प्रत्यक्ष भेटीचा आनंद लहान मुलामुलींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. कित्येक महिन्यांनतर मुलांची भेट होणार, म्हणून आज गुरुवारी सकाळपासूनच बंदिजन कारागृहात प्रतीक्षेत होते. सकाळी गळाभेट कार्यक्रमास सुरुवात झाली.

हेही वाचा >>> नागपूर : रेल्वेच्या ‘लोको पायलट’ने हॉर्न वाजवला परंतु प्रेमी युगुल रुळावरून बाजूला झाले नाही अन क्षणार्धात…

अनेक बंदिजनांना हुंदके सांभाळत नव्हते. ‘बाबा, तुम्ही घरी कधी येणार…?’ या प्रश्नाने ते नि:शब्द होत होते. वडिलांची अगतिकता बघून मुलांच्याही डोळ्यात पाणी येत होते. कारागृह प्रशासनाने घेतलेल्या या कार्यक्रमाने आमच्यातील खरा माणूस जागा झाल्याच्या भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव आडे, वामन निमजे, तुरुंगाधिकारी दीपक भोसले, माया धतुरे यांच्यासह कारागृहाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.