नागपूर : इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि युवक लवकरच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. मुलीच्या घरच्यांना याची चुणूक लागली अन् दोघांनी पळ काढला प्रेमविवाह केला. अडीच वर्षांनी त्यांचा सुगावा लागला आणि पोलिसांनी शहरात आणले. यावेळी मात्र, पळून गेलेल्या त्या अल्पवयीन मुलीसोबत तिचे ५ महिन्यांचे बाळ देखील सोबत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत राहणारी १६ वर्षीय सोनाली (बदललेले नाव) हिची इन्स्टाग्रामवर चंद्रपूर येथील एका २२ वर्षीय युवकाशी ओळख झाली होती. एकमेकांशी बोलताना ते अधिक जवळ आले आणि एकमेकांच्या प्र्रेमात आकंठ बुडाले. दोघेही सोबत आयुष्य घालविण्याची स्वप्ने बघत होते. तसे असले तरी वय लग्नाचे नसल्याचे दोघांनाही भान होते. दोघेही प्रेमाच्या निखळ प्रवाहात वाहत असताना सोनालीच्या घरच्यांना प्रेमप्रकरण माहिती पडले. सोनाली हिला लहान भाऊ आणि दोन बहिणी आहेत. वडील हाताला मिळेल ती कामे करतात. प्रेमप्रकरणावरून घरच्यांनी तिची समजूत काढली. परंतु, सोनालीचा निर्णय ठाम असल्याने तिने न सांगता घरातून पळ काढला. ती थेट चंद्रपूरला गेली आणि प्रियकराला भेटली. येथून दोघांनी थेट पुणे गाठले. पुण्यात प्रियकराने काम शोधले आणि दोघेही भाड्याने राहू लागले. अल्पवयीन असताना लग्न केल्याचे कायदेशिर परिणाम त्यांना कदाचित माहिती असावे म्हणून सोनाली १८ वर्षांची झाल्यानंतरच त्यांनी लग्न केले. प्रियकराच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न मान्य केल्यानंतर ते चंद्रपूरला सोबत राहू लागले. तर तिचा पती हा कामानिमित्ताने पुण्यात ये-जा करायचा. इकडे मुलगी सापडत नसल्याने सोनालीच्या घरचे पोलिसांकडे सतत विचारपूस करत होते. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला सोनालीचे लोकेशन सापडले आणि त्यांनी थेट चंद्रपूर गाठले. यावेळी तिचा पती पुण्याला होता. पोलिसांनी सोनाली आणि तिच्या ५ वर्षीय बाळाला नागपूरला आणले आणि घरच्यांची भेट घडवून आणली.

यापूर्वीही गेले होते पळून

सोनाली आणि आताचा पती यांची इन्स्टाग्रामवर २०२१ मध्येच ओळख झाली होती. घरच्यांच्या विरोधामुळे दोघांनीही घर सोडत उत्तरप्रदेश गाठले. पोलिसांना तक्रार मिळाल्या त्यांनी दोघांचे लोकेशन शोधून काढत उत्तरप्रदेशातून दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर ६ आॅगस्ट २०२२ मध्ये पुन्हा ते दोघे पळून गेले होते.

Story img Loader