नागपूर : उत्तर भारतात पसरलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम आता महाराष्ट्रावर देखील जाणवू लागला आहे. किमान तापमानात वेगाने घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, डिसेंबरच्या अखेरीस किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर भारतात सध्या थंडीची प्रचंड लाट पसरली आहे. किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाला आहे. त्याचा परिणाम मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रावर देखील होत आहे. उत्तरेकडून थंड वारे वाहून नेण्यासाठी अनुकूल असलेले कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबर अखेरीस प्रचंड गारठा अनुभवावा लागणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हेही वाचा : ‘सर्व रुग्णालये तोट्यात, पण ईशसेवा म्हणून चालवितो’, कोण म्हणतोय असे वाचा…

या थंडीच्या लाटेत विदर्भातील सर्वच ११ जिल्हे तसेच खान्देशातील तीन जिल्हे आणि अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी अशा एकूण २२ जिल्ह्यात थंडीची लाट पसरणार आहे. यावेळी किमान तापमानसह कमाल तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे. सोमवारी विदर्भातील चार जिल्ह्यात तापमान १३ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होते. सर्वाधिक कमी १२ अंश सेल्सिअस इतके तापमान गडचिरोली जिल्ह्यात नोंदवले गेले. दरम्यान, दरवर्षीच्या तुलनेत शीतलहरींची संख्याही कमी असण्याची शक्यता आहे.

विदर्भातील तीन शहरांचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी

उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा विदर्भावर चांगलाच परिणाम जाणवु लागला असून उपराजधानीसह विदर्भातील तीन शहरांचे तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले आहे. गोंदिया आणि यवतमाळ शहराचे किमान तापमान ९ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले असून नागपूर शहरात ९.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हिवाळ्यातील हे सर्वाधिक कमी तापमान असून येत्या काही दिवसात त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. उपराजधानीत हिवाळी अधिवेशन सुरू असून शेवटच्या तीन दिवसात थंडीने चांगलाच कहर केला आहे.

हेही वाचा : “शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो”, विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक

गोंदियात थंडीचा जोर वाढला, शेकोट्या पेटल्या

सध्या थंडीचा जोर वाढू लागला आहे. गारठा आणखी वाढणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया जिल्ह्यात सोमवारी ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडीचा जोर वाढल्याने चौकाचौकात, घराघरांत शेकोट्या पेटू लागल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील वातावरण सध्या आल्हाददायक आहे. गावखेड्यांत पिके बहरली असून तलाव, ओढे, हिरवी झाडे त्यातून वाहणारा गार वारा हुडहुडी आणू लागला आहे. वसुंधरा हिरवळीने नववधूप्रमाणे नटलेली दिसत आहे. पहाटेच्या दवबिंदूमुळे हिरव्या डोंगराळ झाडीच्या भागाचे निसर्गवैभव अधिकच खुलून दिसत आहे. आल्हाददायक व प्रसन्न वातावरण मनाला भावत आहे. दाट जंगल, बोडी, तलाव,नदीतील सकाळच्या सुमारास चंचळणारे पाणी, सूर्याची चमकणारी किरणे पाण्यामध्ये प्रतिमांचे विलक्षण मोहक दृश्य पहावयास मिळत आहे. सायंकाळ होताच गावांगावामध्ये शेकोटी पेटवून सर्व नागरिक एकत्र बसून अनेक भारावणाऱ्या गोष्टी सांगून मनोरंजन करताना दिसतात. पहाटेच्या थंडीसोबतच सर्वत्र पसरणारे धुके निसर्ग सौंदर्यात भर घालत आहेत.

Story img Loader