नागपूर : ‘प्यार किया तो डरना क्या’ असे म्हणत कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रियकर-प्रेयसी पळून जाऊन लग्न करतात. मात्र, प्रियकर-प्रेयसीचे पती-पत्नीच्या नात्यात रुपांतर झाल्यानंतर काही दिवसांतच खटके उडायला लागतात. कौटुंबिक वादातून संसार विस्कळीत होण्याच्या काठावर येतो. गेल्या आठ वर्षांत ४ हजार ९४७ प्रेमविवाह करणाऱ्यांच्या संसारात विघ्न आले आहे. त्या दाम्पत्यांनी भरोसा सेलमध्ये धाव घेतली. लग्नाच्या काही महिन्यांतच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे आणि ‘इगो’ दुखावणे हे प्रमुख दोन कारण प्रेमविवाहात आड येत असल्याचे निदर्शनात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही वर्षांत प्रेमविवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा समावेश आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. प्रेमसंबंध प्रस्थापित झाले आणि प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतल्याची अनेक प्रकरणे आहेत. तसेच सोबत नोकरी करीत असताना ओळख झालेले किंवा एकाच वस्तीत राहणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसींनी प्रेमविवाह केल्याच्याही घटनांचा समावेश आहे. काही महिने किंवा वर्षभर प्रेमप्रकरण झाल्यानंतर लगेच प्रेमविवाह करण्याचा निर्णय तरुण-तरुणी घेतात. अनेकदा दोघांपैकी एकाच्याही हाताला काम नसते, बेरोजगार असतानाही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. लग्नापूर्वी चित्रपटातील कथानकाप्रमाणे मोठमोठी स्वप्ने रंगवतात. मात्र, लग्न झाल्यानंतर प्रियकर-प्रेयसी या नात्याला फाटा मिळून पत्नी-पत्नी हे नवे नाते निर्माण होते. नव्याने संसार थाटल्यानंतर पती हाताला काम शोधतो. दिवसभर राबतो आणि सायंकाळी घरी येतो. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांतच ‘तू पहिल्यासारखा नाही राहिलास…मला वेळ देत नाही’ अशी कुरकुर प्रेयसीची पत्नी झालेल्या तरुणीची असते. तसेच दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत अविश्वास दर्शवतात. अशा तक्रारीतूनच प्रेमविवाह तुटण्याच्या काठावर असतात. एकमेकांपासून घटस्फोट घेईपर्यंत प्रकरण पोहचते. अशाच प्रकारचे तब्बल ४ हजार ९४७ प्रेमविवाह करणारे तरुण-तरुणींनी गेल्या आठ वर्षांत भरोसा सेलमध्ये तक्रारी नोंदविल्या आहेत.

हेही वाचा – ‘नाईट पार्टीं’मुळे ग्रामस्थांसह वन्यजीवांना त्रास; ताडोबालगतच्या रिसॉर्ट्स, हॉटेल्समध्ये रात्रभर चालतो ‘धांगडधिंगा’

हेही वाचा – “महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका

प्रेमविवाहानंतर आलेल्या तक्रारी

२०१७ – ५२४
२०१८ -५५३
२०१९ – ३८६
२०२० – ४५८
२०२१ – ६४१
२०२२ – ७८९
२०२३ – ७८५
२०२४ – ८८१

प्रेमविवाह केल्यानंतर काही महिन्यांतच संसारात विस्कटल्याच्या तक्रारी घेऊन पती-पत्नी येत असतात. वैवाहिक जिवनात अहम आणि लग्नापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे खटके उडतात. दोघांचेही समूपदेशन करण्यात येते. त्यांचा विस्कळीत झालेला संसार पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. – सीमा सुर्वे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur love marriage husband and wife life disturbance bharosa cell newly married couple adk 83 ssb