नागपूर : विदर्भाचे वैभव असलेली आणि पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व असलेल्या मारबत- बडग्या मिरवणुकीला नागपूरकरांच्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बदलापूर आणि कोलकाता येथील घटनेत महिलांवरील अत्याचाराचा निषेध करणारा आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांची मत मिळवणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात बडगे यावर्षीचे खास आकर्षण होते. घेऊन जा गे बडग्या… अशा घोषणा देत तरुणाई मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

दरवर्षी राजकीय नेत्यांवर भाष्य करणारे बडगे असतात, यावेळी मात्र एकही बडगा मिरवणुकीत नव्हता हे विशेष. शहराचा व्यापारी परिसर असलेल्या इतवारीतील जागनाथ बुधवारी परिसरातून सकाळी पिवळी मारबतीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. तर काळ्या मारबतची मिरवणूक नेहरू पुतळ्याजवळील पोहा ओळीतून सुरू झाली. काळी आणि पिवळी मारबतीचे नेहरू पुतळ्याजवळ मिलन झाल्यानंतर, खऱ्या अर्थाने मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहचला होता. यावेळेचे खास आकर्षण म्हणजे बदलापूर आणि कोलकाता येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करणारे वेगवेगळ्या संघटनांचे सात बडगे मिरवणुकीत सहभागी झाले होते. या सर्व बडग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भाजपने राष्ट्रवादी व सेनेत फूट पाडली , आता महिलांना तीन हजार रुपये देऊन सत्ता मिळवण्याचे प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करणारा बडगा विदर्भ क्रांती दलाने तयार केला होता.

हेही वाचा : “भ्रष्टाचारी महायुती सरकारला घेऊन जा गे मारबत…” गोंदिया युवक काँग्रेसकडून निषेध

शहीद चौक ते शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोकांनी गर्दी केली होती. यशिवाय युवकांना नोकरी न देणाऱ्या सरकारचा बडगा आणि गंगाजमूना हटाव अशी मागणी करणाऱ्या बडग्याने सर्वाचे लक्ष वेधले. यासह काळी पिवळी मारबतीसह यावर्षी लाल मारबत मिरवणुकीत काढण्यात आली. छत्तीसगढी समाज बडग्या उत्सव मंडळ, तेला समाज बालमित्र बडग्या उत्सव मंडळ, सार्वजानिक बडग्या उत्सव मंडळ विदर्भ क्रांती दल,अविघ्न बडग्या उत्सव मंडळ आदी संस्थेच्या माध्यमातून बडगे काढण्यात आले.

हेही वाचा : बुलढाणा: मराठवाड्यात कोसळधार, खडकपूर्णा ‘ओव्हरफलो’; ३७ गावांना धोका…

१४४ वर्षांची ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा व ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा असलेला मारबत व बडग्या उत्सव सुरू झालेला आहे. समाजातील अनिष्ट रूढी प्रथांचे उच्चाटन करण्याचे हेतूने पोळ्याच्या पाडव्याला म्हणजेच तान्हा पोळ्याला मध्य आणि पुर्व नागपुरात या मारबतीची मिरवणूक काढली जात असल्यामुळे केवळ नागपुरातील नाही जिल्ह्यातील विविध गावागावातून लाखो लोक मिरवणूक बघायला आले होते. वाईट रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेचा दहन करून, चांगल्या परंपरा आणि विचारांचा स्वागत करणे म्हणजे मारबत उत्सव आहे. मारबत उत्सवाला महाभारताच्या काळात संदर्भ देखील दिला जात असल्यामुळे काळी व पिवळ्या मारबतीची अनेक महिलांनी ओटी भरुन दर्शन घेतले.