नागपूर : विधानसभेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा विजय झाला. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच आता नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आमदार फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून त्याचे नाव मात्र अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी प्रदेश काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडे सर्व फुटलेल्या आमदारांबाबत अहवाल सादर केला आहे.

माजी मुख्यमंत्री व भाजपचे विद्यमान राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांचे समर्थक पण अजूनही काँग्रेसमध्ये असलेले काही आमदार फुटणार असल्याची कल्पना प्रदेश काँग्रेसला आधीच होती. तसेच आणखी एखाद दुसरा आमदार फुटले हे देखील गृहीत धरण्यात आले होते. परंतु सात आमदार फुटल्याने प्रदेश काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे. प्रदेश काँग्रेसने तातडीने तसा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवला असून कारवाईची परवानगी मागितली आहे.

हेही वाचा : वाशिम : ४५ हजारावर लाडक्या बहिणी लाभासाठी रांगेत, अर्ज दाखल करण्याची लगबग…

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी शुक्रवारी विधानसभेच्या आमदारांकडून विधिमंडळात मतदान झाले. या निवडणुकीसाठी १२ उमेदवार उभे होते. या निवडणुकीत भाजपकडे मित्रपक्ष मिळून ११० आमदार होते. पण, भाजपला ११८ मते मिळाली. शिंदे गटाकडे एकूण ४७ मते होती. त्यांना ४९ मते मिळाली तर अजित पवार गटाकडे एकूण ४२ मते होती. त्यांना एकूण ४७ मते मिळाली. यापैकी सात मते काँग्रेसची असल्याचे समजते.

जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. महाविकास आघाडीपैकी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय तर शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे दिसून आले. या आमदारमध्ये एक आमदार नागपूर जिल्ह्यातील असल्याची जोरदार चर्चा आहे. आता तो आमदार कोण याचा शोध काँग्रेसमधील विरोधी गटाकडून घेण्यात येत आहे. या निवडणुकीत महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमदेवारांचा विजय झाला. या निवडणुकीत काँग्रेसकडे ३७ मते होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची केवळ २५ मते मिळाली.

हेही वाचा : सोन्याच्या दरात वारंवार चढ- उतार, हे आहेत आजचे दर…

नाना पटोले काय म्हणाले?

मागच्या विधानपरिषद निवडणुकीतही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी काही बदमाश आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले होते. त्यावेळी ते आमदार कोण होते, याचा पत्ता लागला नव्हता. मात्र, यावेळी आम्ही व्यूहरचना आखली होती. यात काही बदमाश आमदार अडकले आहेत. त्यांच्याबाबत आम्ही वरिष्ठांना माहिती दिली आहे. ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात काम केले आहे, अशा लोकांना लवकरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी संतप्त प्रतिक्रिना नाना पटोले यांनी दिली.