नागपूर : आयटी पार्क चौक ते माटे चौक या रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिक व वाहनधारक त्रस्त असतानाही प्रशासन हे अतिक्रण का काढत नाही, या प्रश्नाचे उत्तर सापडले असून पोलिसांचाच त्यांना आशीर्वाद असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अतिक्रमण काढण्याची मागणी वारंवार नागरिकांकडून होत असताना, विक्रेत्यांच्या दुकानापुढे होणाऱ्या गर्दीमुळे रोज वाहतूक कोडीं होत असतानाही पोलीस आणि महापालिका प्रशासन हे अतिक्रमण का काढत नाही, त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला होता. लोकसत्तामध्ये याबाबत वृत्त प्रकाशित होताच प्रशासनात खळबळ उडाली होती. पण त्यांनी अतिक्रमण काढणे सोडून विक्रेत्यांकडूनच रोख वसुली सुरू केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

हेही वाचा >>>‘मातोश्री’ची बुलढाण्यात मोठी खेळी! नाट्यमय घडामोडी नंतर जयश्री शेळकेंना उमेदवारी!!

आयटी पार्क चौक ते चौकापर्यंतच्या रस्त्यावर जवळपास दीडशेवर खाद्यपदार्थाचे दुकाने आहेत. सोनेगाव वाहतूक पोलीस, बजाजनगर पोलीस, प्रतापनगर पोलीस आणि महापालिकेचे अतिक्रमन विरोधी पथकाच्या हप्तेखोरीमुळेच हातठेलेचालकांची हिम्मत वाढली आहे. गायत्रीनगर बसस्टॉपजवळ पोलीस विभागाचे एक वाहन थांबते आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांना खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांचा म्होरक्या येऊन पाकिट देऊन जातो, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी होती. त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी येथे येत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.

हेही वाचा >>>खळबळजनक! नागपुरात आठ लाखांची रक्कम जप्त, आचारसंहिता काळातील पहिली कारवाई

हफ्तेखोरीमुळे अतिक्रमण वाढले

कारवाई होत नसल्याने पूर्वीपेक्षा जास्त हातठेले या रस्त्यावर लागले आहेत. रात्री आठ वाजतानंतर हातठेल्यासमोर चारचाकी आणि दुचाकी वाहनांची मोठी गर्दी असते. ग्राहक अस्ताव्यस्त वाहने ठेवतात, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी निर्माण होऊन सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मद्यपानाचे अड्डे!

खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानावर मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी येतात. मध्यरात्रीच्या सुमारास काही दुकानावर तरूण-तरुणींना मद्यपान करू दिले जाते. त्यासाठी पाणी दुकानचालक पुरवत आहेत. या सर्व प्रकाराकडे पोलीस ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे काही खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकाने तर ‘मिनी बार’ झाल्याचे चित्र दिसते.