तमाम नागपूरकरांनी पक्षाच्या बाजूने बहुमताचा कौल दिलेला असल्याने आता भगवीकरण हीच काळ्या दगडावरची रेघ आहे, त्याला दुसरा पर्यायच नाही, असा ठाम निर्धार भाजपच्या नेत्यांनी सध्या करून घेतलेला दिसतो. शहरातील सर्व आमदार, खासदार, महापालिकेतील सत्ताधारी, हे सारे भगवेसमर्थक असल्याने या शहरात राहणाऱ्या साऱ्यांची मने सुद्धा भगवीमय झालेली आहे, असे या पक्षाला वाटत असेल तर त्यात काही गैर आहे. असे कुणी वाटून घेण्याचे कारण नाही. विरोधी पक्षाला तर यावर बोलण्याचा अधिकारच शिल्लक राहिलेला नाही, त्यामुळे आता सारे शहर भगवे दिसावे, यासाठी महापालिकेने जोरात मोहीम हाती घेतली आहे. जे जे लोकांच्या नजरेत भरणारे असेल ते ते भगवेच असले पाहिजे, असा संकल्प पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सोडला आहे. सामान्य नागरिक कुठेही फिरायला निघाला की, त्याला सारे भगवेच दिसायला हवे. दुसरा रंग किंवा त्या रंगाच्या मागे असलेला विचार दिसायलाच नको, असा या सत्ताधाऱ्यांचा कटाक्ष आहे. पालिकेच्या शाळा, सार्वजनिक इमारती, मोठय़ा बागा आणि दर्शनी, या शब्दात येणारे जे काही असेल ते भगवेच हवे, यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले आहे. सध्या भगव्याने तमाम नागपूरकरांच्या मनात घर केलेच आहे, मग जे मनात आहे ते डोळ्यांना का दिसू नये, असा साळसूद विचार या पक्षाच्या नेत्यांनी केला असेल तर त्यात गैर ते काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा