नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा मतदारसंघ आहेत. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ राज्यकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून याकडे केवळ नागपूरकरांचंच नाही, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास नेमका कसा राहिला आहे? गेल्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघाची सद्यस्थिती काय? याविषयी जाणून घेऊया.

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ हा नेहमीच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निर्मिती ही २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधी म्हणजे २००८ साली झाली. त्यानंतर २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना रिंगणात उतरवले. तेव्हापासून आजपर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते सलग तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तसेच त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपदही सांभाळलं आहे.

हेही वाचा – Nanadgaon : नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्यांच्याभोवती फिरणारं राजकारण आणि भुजबळांशी वैर, यावेळी कांदे गड राखणार?

२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने प्रफुल्ल पाटील यांना उमेदवारी दिली होती. याशिवाय बसपाने डॉ. राजेंद्र पडोले, शिवसेनेने पंजू टोटवानी, तर राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीप पंचकुले यांना रिंगणात उतरवले होते. यापैकी देवेंद्र फडणवीस यांना ५९.२१ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना एकूण २८.५७ टक्के मते मिळाली होती. याशिवाय बसपाच्या राजेंद्र पडोले यांना ८.६० टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप पंचकुले यांना ०.५३ टक्के मते मिळाली होती.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचं झाल्यास, काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आशीष देशमुख यांना रिंगणात उतरवले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने रवींद्र शेंडे, बसपाने विवेक हडके, आपने अमोल हडके यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना ५६.८६ टक्के, तर आशीष देशमुख यांना ३१.१८ टक्के मते मिळाली होती. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ४.५९ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना विजय मिळाला असला तरी त्यांची मतं जवळपास दोन टक्क्यांनी कमी झाल्याचं बघायला मिळालं होतं.

या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००९ पासून सलग विजय मिळवला आहे. मात्र, त्यांच्या मतांमध्ये सातत्याने घट झाली आहे, त्यामुळे २०२४ मध्ये महाविकास आघाडीने प्रबळ उमेदवार दिल्यास देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच मतदारसंघात संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या मतांमध्ये घट झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवाराला ६५ हजार मते मिळाली होती. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नितीन गडकरी यांना केवळ ३३ हजार मते मिळाली.

हेही वाचा – Chhagan Bhujbal : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. असे झाल्यास या मतदारसंघात विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत होण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. मात्र, या मतदारसंघाच्या निर्मितीपासून म्हणजेच २००९ पासून काँग्रेसला एकदाही इथे विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून या मतदारसंघावर दावा केला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.