नागपूर : सेफ अँड स्मार्ट सीटी प्रकल्पाअंतर्गत शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून साडेतीन हजारावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र, सध्या तब्बल हजारावर सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत आहेत. त्यामुळे शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेसह शहरातील वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलीस विभागाला अडचणीचे ठरत आहेत.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जवळपास ५२० कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी सर्व्हिलन्सचा प्रकल्प उभारला गेला. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती प्राप्त केली. त्यानुसार सध्या शहरातील सातेशेहून अधिक चौकांमध्ये ३ हजार ६८६ सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत, परंतु मेट्रोचे काम, सिमेंटचे रस्ते आणि उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे १ हजार ७३ ठिकाणचे कॅमेरे बंदावस्थेत आहेत. हा प्रकल्प महापालिका व पोलिसांतर्फे संचालित करण्यात येत आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षात सीसीटीव्हीसाठी स्वतंत्र केंद्र निर्माण करण्यात आले आहे. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे आणि गुन्ह्यांचा तपास करण्यात येतो. मात्र, १०७३ सीसीटीव्ही कॅमेरे बंदावस्थेत असल्यामुळे शहरातील ४० टक्के परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत नाही. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचोरी, गुन्हेगारांची पळापळ किंवा आरोपींवर पाळत ठेवणे पोलिसांसाठी मोठे अडचणीचे झाले आहे. एखाद्या किचकट गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजला खूप महत्त्व असते. परंतु, आता बरेच सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. अनेक भागात वाहन क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद होत नाही. शिवाय चालत्या वाहनांचे क्रमांक स्पष्टपणे कॅमेऱ्यात दिसत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. त्यामुळे गुन्हे व अपघातांच्या तपासामध्ये पोलिसांसमोर अनेक अडचणी येत आहेत.

हेही वाचा – अमरावती, छत्रपती संभाजीनगरच्या ज्वारी खरेदी उद्दिष्टाला कात्री; अकोल्यासह पाच जिल्ह्यांच्या…

दुरुस्तीबाबत गांभीर्य नाही

शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मुंबईच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीकडे आहे. मात्र, शहरातील २७७ कॅमेरे पूर्णतः बंद आहेत तर १०७३ कॅमेऱ्यांतून प्राप्त चलचित्र दिसत नाही, ते फक्त संग्रहित होत असल्याचा दावा यंत्रणेकडून केला जात आहे. शहराची सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता कंपनीने बंद पडलेले कॅमेरे वेळेवर दुरुस्ती करण्या यावे. मात्र, कंपनीकडून दुरुस्ती व देखभाल करण्याकडे नेहमी दुर्लक्ष करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – अमित शहा नागपुरात, गडकरी काश्मिरमध्ये, तर्कवितर्कांना ऊत

वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याचा सर्वात मोठा फटका वाहतूक पोलिसांना बसला आहे. वाहतूक शाखेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चालान कारवाई करण्यात येते. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीवरही नियंत्रण ठेवल्या जाते. मात्र, हजारावर कॅमेरे बंद असल्यामुळे वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.