नागपूर : नागपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस प्रत्येकी दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नागपूर- सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ आणि ३ ऑक्टोबरला तर सिकंदराबाद- नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ५ आणि ६ ऑक्टोबरला धावणार नाही. १६ सप्टेबरला सुरू झालेल्या गाडीला १५ दिवसांनी रद्द करण्याची वेळ आली आहे.

नारंगी रंगाची २० डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस नागपूर-सिकंदराबाद-नागपूर या मार्गावर सुरू झाली आहे. ही गाडी मंगळवार वगळता दररोज आहे. या गाडीला नागपूर ते सिकंदराबादचे अंतर कापण्यासाठी ७ तास १५ मिनिटे लागतील. ही गाडी नागपूरहून पहाटे ५ ला निघते आणि दुपारी सिकंदराबादला १२.१५ ला पोहोचते. १३० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी ही गाडी नागपूरहून निघाल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामागुंडम आणि काझीपेठ स्थानकांवर थांबते. त्यानंतर थेट सिकंदराबादला जाते. वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादहून दुपारी १ वाजता निघते आणि नागपूरला रात्री ८.२० वाजता पोहोचते. सध्या नागपूरहून नागपूर -सिकंदराबाद, नागपूर- बिलासपूर आणि नागपूर इंदूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.

हेही वाचा : “महात्मा फुलेंनी लिहिलेल्या ओळी या सरकारने बदलल्या”, वडेट्टीवारांकडून पुराव्यासह…

२० डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस काही मोजक्या मार्गावर सुरू आहे. यामध्ये नागपूरचा समावेश आहे. चेअर कार आणि एक्झीक्युटिव्ह क्लासची सुविधा असलेल्या या अत्याधुनिक रेल्वेगाड्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे १६ सप्टेंबरला लोकार्पण केले होते. त्यानंतर १३ दिवसांनी ही गाडी रद्द करण्याची वेळ आली आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील काझीपेठ – बल्लारशाह दरम्यान रेल्वेमार्गाच्या कामाच्या संदर्भात हसनपर्थी स्थानकावर इलेक्ट्रॉनिक नॉन इंटरलॉकिंगच्या तरतुदीसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन दिवस नागपूरहून निघणारी आणि दोन दिवस सिकंदराबाद निघणारी वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात येत आहे.

हेही वाचा : राजकीय नेते जगाला मागदर्शन करतात, मात्र स्वत: काहीच….गडकरींनी पुन्हा टोचले कान….

वैशिष्ट्य

भारतातील सर्वात आधुनिक गाड्यांपैकी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. ती संपूर्ण वातानुकूलित आहे. गाडीत खानपान सुविधा आहे. स्वयंचलित दरवाजे, स्मोक अलार्म, पाळत यंत्रणा, गंध नियंत्रण प्रणाली, सेन्सरी टॅप इत्यादींचा समावेश होतो. प्रवाशांना गाडी चालकांशी बोलण्याची व्यवस्थादेखील आहे. या गाडीमध्ये जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली आहे. बायो-व्हॅक्यूम टॉयलेट आणि फिरते आसन (केवळ एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये) ही वैशिष्ट्ये आहेत. तिची वेगमर्यादा ताशी १६० प्रतिकिलोमीटर इतकी आहे. पण, सध्या १३० प्रतिकिलोमीटर या वेगाने धावते.