नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे ते अधिक महत्त्व २०१४ मध्ये फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर आले. नागपूर हे राज्याचे केंद्रबिंदूच ठरले. अशा जिल्ह्यातील सर्वच निवडणुकीकडे प्रत्येक घटकांचे लक्ष असणे स्वाभाविकच. त्यात विधानसभा निवडणुका म्हंटल्यावर रिंगणातील उमेदवारांची चर्चा अधिक होते. नागपूर शहरात व जिल्ह्यात प्रत्येक सहा या प्रमाणे १२ मतदारसंघ आहेत. त्यात तब्बल २१७ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणूक लढवणा-यांमध्ये भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत, विद्यमान आमदार विकास ठाकरे यांचा समावेश आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील काटोल मधून व माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा या सावनेरमधून निवडणूक लढवत असल्याने देशमुख व केदार यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
हेही वाचा…यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…
नागपूर जिल्ह्यात अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील एकूण १२ विधानसभा मतदारसंघातील ७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता सर्व मतदारसंघ मिळून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या २१७ इतकी असल्याचे निवडणूक विभागाने कळवले आहे.
काटोल मतदारसंघात २२ अर्ज आले होते. पाच जणांनी अर्ज मागे घेतले असून १७ उमेदवार मैदानात आहेत. सावनेरमध्ये २१ अर्ज आले होते. ३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता १८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. हिंगण्यात २६ अर्ज दाखल झाले होते. ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता १८ उमेदवार रिंगणात आहेत. उमरेडमध्ये २२ अर्ज दाखल झाले.११ उमेदवारांनी माघार घेतली. ११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात १३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी फक्त एकाने अर्ज मागे घेतला. १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
हेही वाचा…‘भाजप’कडून फराळ वाटप नियमात, मात्र संविधान जागर नियमबाह्य.. हा कोणता कायदा?
दक्षिण नागपूरमध्ये २४ अर्ज होते. दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता २२ उमेदवार रिंगणात आहेत. पूर्व नागपूरमध्ये २३ जणांनी अर्ज दाखल केले होते. सहा जणांनी माघार घेतली. आता १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मध्य नागपूरमध्ये ३२ अर्ज आले होते. १२ उमेदवारांनी माघार घेतली. २० उमेदवार रिंगणात आहेत.
हेही वाचा…अमरावती जिल्हयात अनेकांच्या तलवारी म्यान…पण, सात बंडखोर मात्र…
पश्चिम-नागपूरमध्ये २३ अर्ज दाखल झाले होते. तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतला असून आता २० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. उत्तरमध्ये ३० अर्ज होते. चौघांनी माघार घेतली तर २६ उमेदवार रिंगणात आहेत. कामठीत २९ अर्ज आले होते. १० जणांनी अर्ज मागे घेतले, १९ रिंगणात आहेत. रामटेकमध्ये २४ अर्ज आले होते. ७ उमेदवारांनी माघार घेतली, १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मतदारसंघ | दाखल अर्ज | माघार | रिंगणात |
काटोल | २२ | ४ | १७ |
सावनेर | २१ | ३ | १८ |
हिंगणा | २६ | ८ | ०८ |
उमरेड | २२ | ११ | ११ |
दक्षिण-पश्चिम | १३ | ०१ | १२ |
दक्षिण नागपूर | २४ | ०२ | २२ |
पूर्व नागपूर | २३ | ०७ | १७ |
मध्य नागपूर | ३२ | १२ | २० |
पश्चिम नागपूर | २३ | ०३ | २० |
उत्तर नागपूर | ३० | ०४ | २६ |
कामठी | २९ | १० | १९ |
रामटेक | २४ | ०७ | १७ |
© The Indian Express (P) Ltd