नागपूर: नागपूर जिल्ह्यातील मौझा पेवठा येथे दोन व्यक्तींचा खांबावरील वीज तार चोरण्याच्या प्रयत्नात विजेच्या धक्याने मृत्यू झाला. विद्युत निरीक्षकांच्या माहितीनुसार, मौझा पेवठा येथील कमलेश उईके आणि नितेश बागबंडे यांचा आशिष मेश्राम यांच्या शेतात विजेच्या धक्याने मृत्यू झाला. या घटनेशी महावितरणचा संबंध नाही. हा अपघात वीज तारा तोडताना झाल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवल्याचेही विद्युत निरीक्षकांचे म्हणणे आहे.

शेतमालक आशिष मेश्राम यांनी त्यांच्या जबाबात या दोन्ही मृत व्यक्ती त्यांचाकडे कामावर नसल्याचे स्पष्ट केले. या दोघांना कुणीही या शेतात जाऊन कामे करण्यास सांगितले नव्हते. सदर घटनास्थळ शेतीशिवारात आतमधील भागात आहे. सध्या पावसामुळे शेतात सर्वत्र चिखल आहे. त्यामुळे मृत व्यक्तींचा शेतीची कामे, जागरण अथवा रखवाली करण्यास जाण्याचा संबंधच नसल्याचे शेतमालकाने स्पष्ट केल्याचे विद्युत निरीक्षक म्हणाले.

हेही वाचा – “प्रशासनाचा धाक नसल्याने बदलापूर, कोलकातासारख्या घटना”, राज ठाकरेंचे वक्तव्य; म्हणाले, “न्यायालयात प्रकरण दाखल केली की…”

आशिष मेश्राम यांच्या शेतात लघुदाब वाहिनीचा कट-प्वाईंट (सिमेंट खांबावर) असून त्यातून पुढे एका लघुदाब वाहिनीचा खांब आहे. कट-प्वाईंटमधील वीजतारा चोरी झाल्याने या खांबाला जाणारा वीजपुरवठा पूर्वीपासूनच खंडित करण्यात आला असल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यत आले आहे. मृत कमलेश आणि नितेश हे दोघेही वीजतारा चोरी करण्यासाठी आशिष मेश्राम यांच्या शेतात मध्यरात्री गेले असावे त्यावेळी त्यांनी सिमेंट खांबावरील तारा तोडून ती गोळा करून ते कट-प्वाईंट दिशेने आले असावे आणि तारा खेचण्याच्या नादात एक तार जिवंत वीज तारेच्या एका तारेला स्पर्श होऊन दोघांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यात दोघांचाही मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज महावितरणने व्यक्त केला.

हेही वाचा – जंगलातील ‘रिसॉर्ट’चा मोह वाघालाही आवरेना! ‘रिसॉर्ट’मध्येच वामकुक्षी, अन्…

रोहीत्रावरील एक फेजचा फ्युजतार तुटलेल्या अवस्थेत आढळळा असून पोलिसांनीसुद्धा त्यांच्या पंचनाम्यात मयत व्यक्ती हे वीज तार चोरी करीत असल्याचा उल्लेख केला आहे. हा अपघात वीज वाहिनीचा तार अकस्मात तुटून झालेला नसून चोरीच्या उद्देशाने वीज तारा तोडून टाकत असताना झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास महावितरणसह पोलिसांकडूनही त्यांच्या स्तरावर केला जात आहे.