नागपूर : आगामी विधानसभा निडवणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, मुस्लीम समाज ‘शहाणा’ झाला असून चिथावणीखोर वक्तव्याला भीक घालत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना अपेक्षित धार्मिक दंगली महाराष्ट्रात घडण्याची शक्यता नाही, असे वक्तव्य अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी केले.

महाराष्ट्रातील पुरोगामी सामाजिक संघटनांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘संविधान बचाओ-महाराष्ट्र बचाओ’ अभियान सुरू केला आहे. या अभियानाअंतर्गंत विदर्भात २१ सप्टेंबरपर्यंत १४ ठिकाणी जाहीर व्याख्यान झाले आणि २४ ऑक्टोबरपर्यंत आणखी दहा व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. याबाबत प्रा. श्याम मानव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी त्यांना भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांची चिथावणीखोर वक्तव्य आणि मुस्लीम समाजाचा मोर्चा याबाबत विचारणा केली असता त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

हेही वाचा – विषबाधेमुळे अल्पवयीन बहीण-भावाचा मृत्यू; आदिवासी कुटुंबातील ८ सदस्यांना…

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील विविध पुरोगामी संघटनांनी महाविकास आघाडीचे समर्थन करण्याची कारणे देखील त्यांनी सांगितली. ते म्हणाले, महाराष्ट्रात असंवैधानिक सरकार आहे. पक्षांत्तर कायद्यानुसार हे सरकार अस्तित्वात राहू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सरकार स्थापनेची प्रक्रिया अवैध ठरवली, परंतु पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले नाही. भाजपने जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिधींची खरेदी करून आपल्याला हवी तसे सरकार बनवण्याचे काम केले आहे. यात लोकशाहीचा गळा आवळण्यात आला. भोंदूबाबा जातीवाचक उल्लेख करून लोकांचा अपमान करतात, पण त्यांच्याविरुद्ध ‘ॲट्रासिटी’ गुन्हा दाखल केला जात आहे. त्याला संरक्षण दिले जाते. संविधानाचे उल्लंघन केले जाते. महाराष्ट्रात लोकशाही पुर्नस्थापित करण्यासाठी भाजपला सत्तेबाहेर काढणे आवश्यक आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी संविधानातील समता, बंधूता, स्वातंत्र्य आणि न्याय ही मूल्य मान्य केली आहेत. त्यामुळे त्यांचे आम्ही समर्थन करीत आहोत, असेही ते म्हणाले.

लाडकी बहीणवर महालक्ष्मी भारी ठरेल

लाडकी बहिणी योजना चांगली आहे. यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठेत पैसे खेळू लागेल आणि त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल. काँग्रेसने महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये प्रतिमहिना देण्याचे आधीच जाहीर केले आहे. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ही योजना लागू देखील केली आहे. त्यामुळे लाडकी बहिणी योजनेवर महालक्ष्मी योजना भारी पडेल, असेही प्रा. श्याम मानव म्हणाले.

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये जुने विरुद्ध नवे संघर्ष

आम्ही आंबेडकरांचे वैचारिक पुत्र

महाष्ट्रात निवडणुकीत तिसरी, चौथी आघाडी चालणार नाही. लोकांना संविधानाने चालणारे सरकार हवे आहे. केवळ आंबेडकरांचे नातू असून चालत नाही. ते रक्ताने नातू असले तरी आम्ही वैचारिक पुत्र आहोत, असे प्रा. श्याम म्हणाले.