नागपूर : राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देणार अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली आहे. महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? असा प्रश्न कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधीशी बोलत होते.

हेही वाचा – गोंदियात नामांकित कंपन्यांची २२६ बनावट घड्याळे जप्त

हेही वाचा – ‘एमपीएससी’ आणि ‘पीडब्लूडी’ची परीक्षा एकाच दिवशी! उमेदवारांचा गोंधळ

नाना पटोले म्हणाले, भाजपाचे मोठे नेतेही ४५० रुपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत आहेत. महाराष्ट्रात सध्या भाजपाचेच सरकार आहे मग भाजपा सरकार महाराष्ट्रात ४५० रुपयांना सिलिंडर देत का नाही? महाराष्ट्रातील जनतेने काय पाप केले आहे का? ही सर्व बनवाबनवी आहे, उज्ज्वला गॅस योजनेत केवळ २० टक्के सिलिंडर रिफील केली जातात. ही योजना फेल गेली आहे पण उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गरिबांना मिळणारे केरोसिन मात्र भाजपा सरकारने बंद केले आहे. नफा कमावणे हे सरकारचे काम नाही पण २०१४ पासून सरकार नफा कमावण्याचे काम करत आहे, जनतेची लूट करून नफा कमावणे हे भयावह आहे.