नागपूर : देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करून तरुणांचे आयुष्य बरबाद केले. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, तसेच या पापातील त्यांचे भागीदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माफी मागायला सांगावी, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – सोन्याच्या दरात मोठी उसळी, आजचे दर पहा…

हेही वाचा – कंत्राटी भरतीच्या आदेशावरून भाजपाचे महाविकास आघाडीविरोधात आंदोलन; “शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंनी माफी मागावी”, बावनकुळेंची मागणी

पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा खोटारडा पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खोटे बोलण्याचेच प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे भाजप नेते सातत्याने खोटे बोलत असतात. कंत्राटी भरतीमध्येही फडणवीस यांनी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण राज्यातील जनता विशेषतः तरुण मुले-मुली यांना हा खोटारडेपणा समजतो. राज्यात २.५ लाख सरकारी पदे रिक्त असताना ही पदे सरकार भरत नाही. शिक्षक भरती, पोलीस भरती, एमपीएससी, तलाठी भरतीमधील घोटाळा, हे पाप भाजपाचेच आहे. काही तरुण मुले मुली दोन-तीन वर्षांपासून केवळ नियुक्तीपत्र मिळाले नाहीत म्हणून नोकरीवर रुजू होऊ शकले नाहीत. एमपीएससीचा सावळा गोंधळ सुरूच आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार सारखी अत्यंत जबाबदार व महत्त्वाची पदे एमपीएससीकडून न भरता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जीआर मागच्याच महिन्यात काढला होता. पण खोटारडे फडणवीस स्वतःचे पाप दुसऱ्यावर टाकून नामानिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असेही पटोले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nana patole criticized devendra fadnavis over the contract recruitment rbt 74 ssb