भाजपचे खासदार नाना पटोले यांना तीन वर्षांत मतदारसंघात विकासकामे करता आली नाहीत. त्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. पटोले यांना याची कल्पना आहे. त्यामुळे ते महाराष्ट्रात फिरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यावरही टीका करत आहेत, असे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी नाना पटोले यांना निवडून दिलेले आहे. या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी विविध योजना खासदार पटोले मतदारसंघात आणतील, अशी अपेक्षा जनतेला होती. परंतु, तीन वर्षे निघून गेली. पटोले यांना कोणतीही विकासकामे करता आलेली नाहीत. मतदारसंघात कोणताही मोठा उद्योग आलेला नाही. यामुळे मतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी खासदार पटोले पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यापर्यंत विविध आरोप करीत आहेत, असेही पटेल म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारशी संघर्ष करण्याचे पटोलेंचे संकेत दरम्यान, विदर्भातील शेतकरी संकटात असून त्यांच्यासाठीचे कार्यक्रम माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत दिल्लीत आयोजित पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला गैरहजर राहणारे भाजपचे गोंदियाचे खासदार नाना पटोले हे मंगळवारी विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण व वन स्थायी समितीच्या बैठकीला दिल्लीत उपस्थित होते. सोमवारी दिल्लीत झालेल्या भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश पक्षाच्या सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी यांना दिले होते. मात्र, पटोले अनुपस्थित होते. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थितीत असल्याबद्दल पटोलेंना विचारले असता त्यांनी शेतकऱ्यांचे कारण दिले.