नागपूर : विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा प्रदीर्घ काळानंतर स्वीकारण्यात आला असून त्यांच्या जागी विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली आज आहे. असे झाल्यास आतापर्यंत पूर्व विदर्भाकडे असलेले प्रदेशाध्यक्षपद पश्चिम विदर्भाकडे जाईल. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण ? याबाबत काँग्रेस वर्तुळात चर्चा सुरू होती. इच्छुकांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश होता. त्यात सर्वात मोठे आणि अग्रस्थानी असलेले नाव पश्चिम महाराष्ट्राती सतेच पाटील यांचे होते. दुसरे नाव विश्वजीत कदम यांचे होते. आतापर्यंत विदर्भाला प्रदेशाध्यक्षपद दिल्याने आता ते पश्चिम महाराष्ट्राकडे द्यावे, यानिमित्ताने मराठा समाजाचा विचार होईल, असी भावना या दोन नावांच्या मागे होती. विदर्भातून विजय वडेट्टीवार हे इच्छुक होते.मात्र त्यांच्या पक्षनिष्ठेवर श्रेष्ठींना विश्वास नसल्याने ते नाव मागे पडले होते. माजी मंत्री यशोमती ठाकूर या इच्छुक नव्हत्या. त्यामुळे विदर्भातील चर्चेत नसलेले पण पक्षनिष्ठा आणि राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे आले. त्याच्या नावावर एकमत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली आहे. १९९९ ते २००२ या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा त्यावेळी लौकिक होता. २०१४ ते २०१९ या दरम्यान ते काँग्रेसचेआमदारही होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जात असल्याने या निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान नव्या अध्यक्षांपुढे असणार आहे

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ ?

हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका राहीली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिराचे आयोजन, ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव आहे. २०१४ ते २०१९ या दरम्यान ते बुलढाण्याचे आमदार होते. त्यांनी या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता.