लोकसत्‍ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : प्रक्षोभक भाषणामुळे दहा वर्षांपासून प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच ‘एआयएमआयएम’चे आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांच्‍याविषयी लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचारादरम्‍यान माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेले वक्‍तव्‍य गाजले होते. आता पुन्‍हा ते वक्‍तव्‍य चर्चेत आले आहे.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज्‍यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी या निवडणुकीतील पहिलीच सभा काल छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली. या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा १५ मिनिटांचा उल्लेख केला. प्रचाराच्या वेळेचा संदर्भ देत ओवेसी म्हणाले की, ”आता ९ वाजून ४५ मिनिटे झाली आहेत. वेळ झाली आहे. अजून १५ मिनिटे बाकी आहेत, धीर धरा, संयम ठेवा. ना मी त्‍यांचा पिच्‍छा सोडणार ना ते माझा सोडणार…, चल रही है मगर क्‍या गुंज है”. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यावर नवनीत राणा यांनी आज प्रत्‍युत्‍तर दिले. भाजपचे तिवसा मतदारसंघाचे उमेदवार राजेश वानखडे यांच्‍या प्रचारार्थ गुरूकुंज मोझरी येथे उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी बोलताना नवनीत राणा यांनी ओवेसी यांच्‍यावर टीका केली.

आणखी वाचा-अमरावती : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा महापूर! सोने, चांदीसह रोकडही…

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, ”छोटे ओवेसी काल छत्रपती संभाजीनगरमध्‍ये येऊन गेले. ते म्‍हणाले की आता माझ्या घड्याळात ९ वाजून ४५ मिनिटे झाली आहेत. पंधरा मिनिटे बाकी आहेत. मी त्‍यांना म्‍हणते माझ्या घड्याळात ३ वाजले आहेत. केवळ पंधरा सेकंद बाकी आहेत. तुला १५ मिनिटे लागतील, पण आम्‍हाला पंधरा सेकंदही लागणार नाहीत.” अकबरुद्दीन ओवेसी यांनी २०१२ मध्येही १५ मिनिटांचेच एक भाषण केले होते. पोलीस हटवा मग कळेल कोण ताकदवान आहे ते, असे ते त्या सभेत म्हणाले होते. या वक्तव्यांमुळे त्‍यांना तुरुंगातही जावे लागले होते.

आणखी वाचा-राहुल गांधींच्या हातातील संविधानाच्या आत केवळ कोरी पाने! भाजपच्या आरोपाने खळबळ….

नवनीत राणा यांनी आपल्‍या भाषणात काँग्रेसच्‍या आमदार आणि तिवसाच्‍या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्‍यावरही टीका केली. त्‍या म्‍हणाल्‍या, माझ्या नणंदबाईने खूप माया जमवली आहे. सात पिढ्यांना पुरेल इतकी संपत्‍ती आहे. त्‍या जर काही वाटत असतील, तर घेऊन घ्‍या, खूप आहे त्‍यांच्‍याजवळ. नांदगावपेठ येथे देवेंद्र फडणवीस मुख्‍यमंत्री असताना मोठे उद्योग आले. पण, नणंदबाईने येथील तरूणांच्‍या हाताला काम देण्‍यासाठी काहीच केले नाही. गुरूकुंज मोझरी विकास आराखड्याच्‍या कामात भरपूर भ्रष्‍टाचार झाला आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana again remind of 15 second statement about akbaruddin owaisi mma 73 mrj