लोकसत्‍ता टीम

अमरावती : लोकसभा निवडणुकीत फार थोड्या मतांनी आपला पराभव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या विरोधकांनी एकत्र येऊन मतदान केले, पण आम्‍ही नरेंद्र मोदींविषयी प्रेम दाखविण्‍यात कुठेतरी कमी पडलो. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्‍ट्रातील पराभवाबद्दल केंद्रामध्‍ये जाऊन उत्‍तर द्यावे लागले, ही खंत कायम मनात राहील, अशा शब्‍दात माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्‍यानंतर प्रथमच सार्वजनिक ठिकाणी नवनीत राणा यांनी आपले मत मांडले. राजापेठ येथील भाजपच्‍या कार्यालयात चिंतन बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला भाजपचे नेते आशीष देशमुख, खासदार डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-मध्य रेल्वे मालामाल! तिकीट तपासणीतून १३ दिवसांत १.३९ कोटींचा दंड वसूल

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, सुमारे ५ लाखांच्‍या वर मते मिळवूनही आम्‍हाला विजय मिळवता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या पाठीशी देव होते, म्‍हणून त्‍यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्‍हणून शपथ घेण्‍याची संधी मिळाली. सरकार स्‍थापन करताना एकेक खासदार महत्‍वाचा असतो. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने कोसळले होते, याची आठवण आपल्‍याला येत होती. भाजपच्‍या स्‍थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केले, त्‍याबद्दल त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करीत आहे. पराभवात कुणाचीही चूक नाही, आम्‍हीच कमी पडलो.

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकास कामांचा धडाका, अमरावती मतदार संघातील विकासाचे मुद्दे घेऊन आम्‍ही लोकांसमोर गेलो. पण मोदी विरोधकांनी एकजूट दाखवली, आम्‍ही मोदींविषयी प्रेम व्‍यक्‍त करण्‍यात कमी पडलो. मी भाजपची कार्यकर्ती म्‍हणून अखेरपर्यंत काम करणार आहे. पराभवाचे चिंतन सर्वांनी केले पाहिजे. पराभवाविषयी वेगवेगळी गणिते मांडली जात आहेत, पण आपला त्‍यावर विश्‍वास नाही. काय घडले, कसे घडले, याचा विचार सर्वांनीच केला पाहिजे. आम्‍ही समर्पणात कमी पडलो, याची खंत राहील.

आणखी वाचा-धक्कादायक! शाहरुख खानने आमिर खानवर केला चाकू हल्ला; कशावरून झाला वाद? वाचा…

नवनीत राणा म्‍हणाल्‍या, संविधान बदलाविषयी गैरसमज पसरविण्‍यात आले. पण, ज्‍या क्षेत्रात आरक्षणाविषयी संवेदनशीलता आहे, त्‍या मेळघाट या आदिवासीबहुल भागातून मला मताधिक्‍य मिळाले, ही सर्वात मोठी समाधानाची बाब आहे. शेतकरी नाराज आहेत, असे सांगण्‍यात येत होते, पण ग्रामीण भागातून आपल्‍याला बरोबरीने मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत जे झाले, ते झाले. पण आता विधानसभा निवडणुकीत या चुका व्‍हायला नकोत. देवेंद्र फडणवीस यांची नाळ अमरावतीसोबत जुळली आहे. भाजपमधील गटबाजी आता संपवावी लागणार आहे. कारण, पक्ष टिकला, तरच कार्यकर्त्‍यांची किंमत राहणार आहे.

पाच मतदार संघांवर कमळ

अमरावती लोकसभा क्षेत्रातील सहापैकी पाच विधानसभा मतदार संघावर आपल्‍याला कमळ म्‍हणजेच भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्‍यासाठी, देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्‍यासाठी विजय मिळवणे आवश्‍यक आहे. पाच मतदार संघांमध्‍ये कमळ चिन्‍ह मिळाले पाहिजे, यासाठी आम्‍ही प्रयत्‍न करू. मी एक कार्यकर्ती म्‍हणून राज्‍यात आणि केंद्रात यापुढे काम करणार असल्‍याचे नवनीत राणा यांनी सांगितले.