गडचिरोली : जहाल नक्षल नेता गिरीधर याच्या आत्मसमर्पणानंतर नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समिती सदस्य आणि कंपनी १० चा कमांडर रुपेश मडावी चकमकीत ठार झाला आहे. २३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका महिलेसह तीन नक्षलवादी ठार झाले. यात रुपेशचा समावेश आहे. त्याच्यावर तीन राज्यात ७५ लाखाहून अधिक बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीतील प्रमुख नक्षल नेता म्हणून त्याची ओळख होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबररोजी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ असलेल्या सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार पोलीस हद्दीत येणाऱ्या करकनगुडा, अबुझमाड जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली. यावरून डीआरजी, बस्तर फायटर आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी या परिसरात संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबविले. दरम्यान, पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. ही चकमक जवळपास चार तास सुरु होती. घनदाट जंगलाचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. चकमक स्थळी पोलिसांनी शोध घेतला असता रात्री उशिरा तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. २४ सप्टेंबरला सकाळी मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात आली. यामध्ये रुपेश मडावी (४७) आणि जगदीश याचा समावेश आहे.

हेही वाचा – सावधान ! यवतमाळ शहराजवळ पट्टेदार वाघ फिरतोय

रुपेशवर ७५ लाखाचे बक्षीस

गेली २५ वर्षे गडचिरोलीच्या नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेला रुपेश अहेरी तालुक्यातील देचलीपेठा पोलीस हद्दीत येणाऱ्या शेडा या गावातील रहिवासी होता. त्याच्यावर खून, जाळपोळसह ७० हून अधिक गुन्हे दाखल होते. त्यांच्यावर तीन राज्यात ७५ लाखांहून अधिक बक्षीस होते. तर जगदीश नक्षल्यांचा माड एरिया तांत्रिक विभागीय समितीचा सदस्य होता. यातील महिला नक्षलवाद्याची ओळख पटलेली नाही.

हेही वाचा – नागपूर मेट्रोत तांत्रिक बिघाड, सेवा खंडित; प्रवाशांची गैरसोय

चळवळीला जबर हादरा

काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विभागीय समितीचा सदस्य आणि कंपनी दहाचा प्रमुख जहाल नक्षल नेता गिरीधर याने आत्मसमर्पण केल्यानंतर रुपेश मडावी याच्यावर चळवळीत महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गेल्या काही वर्षात पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे मोठे नक्षल नेते ठार झाले. सोबतच गिरीधर सारख्या जहाल नक्षलवाद्याने सपत्नीक आत्मसमर्पण केले. त्यानंतर प्रभाकर आणि रुपेश या दोन जहाल नक्षलवाद्यांवर गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, रुपेश ठार झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समिती आणि कंपनी दहाची संपूर्ण जबाबदारी जहाल नक्षल नेता प्रभाकर स्वामी याच्याकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.