बुलढाणा: भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथे शरद पवारांवर खालच्या पातळीवर केलेल्या टिकेने राजकीय वर्तुळात वादळ निर्माण झाले असून ‘त्या’ विधानावर विविध पक्षीय नेत्यांनी नापसंती व्यक्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी नुकतेच पुण्यात शरद पवारांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) नेते, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही या विधानाचा निषेध केला आहे. राजकीय परिस्थिती मुळे आपण अजितदादां सोबत गेलो असलो तरी, शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांवर अशी शेलक्या भाषेत टीका करणे योग्य नाही. वयाने आणि कर्तृत्वाने ज्येष्ठ असलेल्या शरद पवार यांना राज्यातील भ्रष्टाचाराचे सरदार वा भटकती आत्मा संबोधने, वैयक्तिक पातळीवर टीका करणे अयोग्य आणि निषेधार्हच असल्याचे मत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. राजकारणात गट, तट मतभेद, रुसवे फुगवे असू शकतात. मात्र ते वैयक्तिक पातळीवर जाता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शरद पवार हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदरणीय आहेत. राज्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्यांनी आपली वेगळी छाप ठेवली आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्यांनी शेतकरी आणि लोकहित जपले आहे. अशा नेतृत्वाबद्दल अशा खालच्या पातळीवर केली जाणारी विधाने निश्चितच निंदनीय आहेत. मनाला वेदना देणारे आहेत.

महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक म्हणजे पाच वेळा मुख्यमंत्री, देशाच्या राजकारणातही संरक्षण मंत्री, कृषिमंत्री अशी अनेक पदे पवार यांनी भूषविली. आयुष्याच्या उतार वयाच्या टप्प्यामध्ये अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल खालच्या पातळीशी विधाने करणे संयुक्तिक नाही. राजकारणामध्ये लढाई किंवा मतभेद हे विकासासाठी लोकहितासाठी असावेत. वैयक्तिक पातळीवर जाऊन अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वाबद्दल टिप्पणी होऊ नये अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. या खालच्या पातळीवरील टीकेमुळे आपण व्यथित झालो असून ही टीका माझ्याही मनाला वेदना देणारी असल्याचे आमदार शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. ‘वय, कर्तृत्व व नेतृत्वाने पवार साहेब श्रेष्ठच आहेत. राजकारणामध्ये परिस्थितीनुसार किंवा जनभावनेच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घ्यावे लागतात. तसा निर्णय आपणही घेतला. मात्र याचा अर्थ असा नाही की, ज्या नेतृत्वाने आपल्याला घडवले किंवा मोठे केले त्याच्याबद्दल काहीही ऐकून घेणार. यामुळे त्यांच्यावरील खालच्या स्तरावरील टीका मनाला वेदना देणारी ठरल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

हेही वाचा : “मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र आहे का…?”, माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा सवाल

साहेबांशी ऋणानुबंध आणि कळीचा मुद्दा

दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आमदार राजेंद्र शिंगणे यांचे जुने ऋणानुबंध आहेत. त्यांचे वडील सहकार महर्षी दिवंगत भास्करराव शिंगणे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घनिष्ठ संबंध होते. आमदार राजेंद्र शिंगणे यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा सांभाळला. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सांभाळले. जिल्हा बँक त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला.१९९५ मध्ये त्यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मोठ्या पवारांनी त्यांना सतत पाठबळ दिले.महत्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद,बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले. दोन वेळा बुलढाणा लोकसभेची उमेदवारी दिली. यामुळे २०१४ चा अपवाद वगळता राजेंद्र शिंगणेंनी राष्ट्रवादी कडूनच लढत दिली. डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँकेला आघाडी सरकारने कर्ज दिले नाही म्हणून २०१४ ची निवडणूक न लढण्याचे धाडस त्यांनी दाखविले. २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी कडून निवडणूक लढत बाजी मारली. अजित पवार यांनी युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेंव्हाही शिंगणे यांची घालमेल सुरू होती. मात्र जिल्हा बँकेला ३०० कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ मंजूर करण्याची ग्वाही मिळाल्याने त्यांनी अजितदादा गटात प्रवेश केला. नुकतेच बँकेला हे कर्ज मिळाले असून राज्य सरकारने हमी घेतली आहे. यामुळे जिल्हा बँक हा त्यांच्यासाठी कळीचा मुद्धा ठरला. मात्र शरद पवार यांच्याविषयीचा आदरभाव आणि कृतज्ञता कायम राहिल्याने त्यांनी अमित शहा यांच्या टिकेवर जाहीर प्रतिक्रिया देऊन मित्र पक्षाला घरचा अहेर दिला आहे.